शिरगाव : पवना नदी प्रदूषण मुक्त व्हावी, या नदीवर असलेल्या जलपरी संस्था टिकून रहाव्यात या उद्देशाने नदीकाठच्या गावांमध्ये धोबीघाट बांधून अंघोळ, कपडे धुण्यासाठी व गावातील इतर सांडपाणी याचा वापर झाल्यावर हे पाणी धोबीघाटात शुद्ध करून नंतर ते नदीत सोडून नदीचे अस्तित्व कायम राहावे यासाठी प्रत्येक गावात एक जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात गोडूंब्रे येथून करण्यात आली असून या प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी (ता.26) करण्यात आले. सदर प्रकल्पामध्ये नदीकाठच्या 32 गावांचा समावेश करून प्रत्येक गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या मान्यवरांची उपस्थिती
यावेळी पावन पवनाचे प्रवीण लडकत, ग्रामप्रबोधिनीचे प्राचार्य व्यंकट भाताने, मनोज पुरावे, सुनील शिंदे, हेमंत वाटावे, रवी सावंत, विजय वायदंडे, डॉ. विश्वास येवले, राजीव भावसर, धनंजय गोडबोले, रमेश सरदेसाई, मोहन गायकवाड, प्रशांत हंबर, लक्ष्मिकांत भावसर, सरपंच रेखा सावंत, उपसरपंच नर्मदा येवले, माजी सरपंच राम सावंत, गणेश सावंत, माजी उपसरपंच आशालता चोरघे, संतोष कदम, ग्रामपंचायत सदस्या सारिका कदम, राजकुमार खराडे, वैशाली खराडे, मुख्याध्यापक संदीप सकपाळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहिमेत 23 संस्था व शाळांचा सहभाग
ग्रामप्रबोधिनी साळूंब्रे यांच्या प्रयत्नातून पवानामाई उत्सवाअंतर्गत 20 वर्षापासून चळवळ सुरू आहे. याच संकल्पनेतून पवना नदीकाठच्या गावांचा विकास व सर्व गावे सांडपाणी मुक्त व कचरामुक्त करण्याच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी काही संस्थांच्या माध्यमातून मोठा उपक्रम हाती घेण्यात आला. यात पिंपरी-चिंचवड येथील भावसार व्हिजन, जलदिंडी प्रतिष्ठान, सिटीझन फोरम, नाम फाउंडेशन, कला जनसेट, आर्ट ऑफ लिव्हिंग, म्याथ्यूर प्लांट, जेएसपीएम संस्था, निसर्ग मित्र, संस्कार प्रतिष्ठान, ग्राहक पंचायत आदींसह 23 संस्था तसेच परिसरातील ग्रामप्रबोधिनी विद्यालय, प्रकाश देवळे विद्यालय, पंचक्रोशी हायस्कूल, तुळजाभवानी विद्यालय आदीसह जिल्हा परिषद शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक यांचा मोठ्या प्रमाणावर हातभार लागणार आहे.
स्वच्छतेला वाहिलेला उपक्रम
या उपक्रमांतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, प्रदूषण मुक्त नदीघाट, आदर्श शाळा विकास करणे, कचर्याची योग्य विल्हेवाट लावणे, वृक्ष लागवड, स्वच्छ व सुंदर गाव ही संकल्पना राबविण्यास गोडूंब्रे येथून सुरुवात करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून शाळेला 3 संगणक संच व एलसीडी प्रोजेक्टर भेट देण्यात आला. तसेच गावात बंदर बांधून सांडपाणी आडवून त्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्ध करून नदीत पाठवण्यात येत आहे. घर व परिसर स्वच्छ तर गाव स्वच्छ अन् गाव स्वच्छ तर नदी स्वच्छ या संकल्पनेतून आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यकर्ते गावातील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना प्रबोधन करत असून स्वच्छतेची शपथ देत आहेत.