जळगाव : शहरातील गुन्हेगारी पुन्हा उफाळून आली असून कासमवाडी परीसरात भरणार्या आठवडे बाजारातील मच्छी बाजाराच्या भागात शुक्रवारी पहाटे एका तरुणाचा चेहरा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सागर वासुदेव पाटील (26, रा.ईश्वर कॉलनी, आठवडे बाजारासमोर कासमवाडी, जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिस अधिकार्यांची धाव
अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दोघांवर यंत्रणेला संशय
ईश्वर कॉलनी परीसरात सागर वासुदेव पाटील हा तरुण कुटुंबियांसह राहत होता. मिळेल ते काम करीत होता. गुरुवारी रात्री तो नेहमीप्रमाणे घरी आला. कुटुंबियांशी गप्पा केल्यानंतर रात्री 1 वाजेच्या सुमारास त्याला कुणीतरी बोलवायला आल्याने तो घराबाहेर पडला. मैदानावर बसलेला असताना सागर पाटील याचा कुणीतरी दगडाने ठेचून त्याची हत्त्या केली. शुक्रवारी सकाळी पहाटेच्या सुमारास घडलेला प्रकार लक्षात आला. पोलिसांना दोघांवर संशय असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केली आहेत. दरम्यान, सागर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असल्याचे समजते. घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ देखील पोहचले आहे.