जळगावात लगेच लूट; कांदा, बटाटा महागला

0

जळगाव – कोरोनाला अटकाव करण्यासाठी संपूर्ण देश 21 दिवस लॉकडाऊन केलेला असताना, जनतेचे वांदे होऊ नयेत म्हणून सरकारने जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे पण या दुकानांतून आता जनतेची लूट होऊ लागली आहे.

गणेश कॉलनी भागातील भाजी विक्री दुकानातून गुढी पाडव्याला सणाच्या दिवशी कांदे, बटाटे चढ्या दराने विकले गेले. काल सायंकाळी कमाल 25 ते 30 रुपये किलो किलो असणारा बटाटा आज चक्क 50 रुपये किलोने विकला जात होता, तर कांदाही 40 रुपये किलो होता, अशी माहिती ग्राहक आर डी साबळे यांनी जनशक्तीला दिली. अन्य भाजी तर गायबच असल्याचे त्यांनी सांगितले. याची प्रशासनाने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कांदे आणि बटाटे जीवनावश्यक आहेत. ते 7 ते 8 दिवस खराब न होता टिकून राहतात. त्यामुळे त्यांना मागणी मोठी आहे. सरकार जीवनावश्यक वस्तू कमी पडू देणार नाही, असे सांगत आहे मग या अचानक दरवाढीचे कारण काय? लॉकडाऊनची संधी साधून साठेबाजी तर केली जात नाही ना? आदी प्रश्न उपस्थित होत आहेत.