जळगाव : शहरातील आदर्श नगरातील वाहने अज्ञाताने पेटवल्याने तब्बल 18 लाख 28 हजार रुपयांचे नुकसान झाले होते. 15 दिवसांच्या अथक परीश्रमानंतर माथेफिरूला पोलिसांनी अटक केली असून संशयीताने सोल्यूशन प्राशन केल्यानंतर नशेत हे कृत्य केल्याची माहिती आहे.
15 दिवसानंतर माथेफिरू जाळ्यात
जळगावातील आदर्शनगरात 13 मे रोजी पहाटे विविध अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी असलेली सात वाहने पेटवल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. त्यात 18 लाख 28 हजारांचे नुकसान झाले होते. या संदर्भात पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
एका ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्यात संशयीत आग लावणारा चित्रीत झाला होता. त्या आधारावर पोलिसांनी चौकशी सुरू केली. शरीरयष्टी, वयाचा अंदाज घेऊन पोलिसांनी 15 दिवसात सुमारे 30 जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यातूनच आकाश गणेश महाजन (21, रा. तांबापुरा) याला अटक करण्यात आली आहे.
नशेत असतानाच वाहनांना लावल्या आगी
जळगावात वाहने पेटवणारा माथेफिरू अखेर पोलिसांच्या जाळ्यातआकाश हा तांबापुरात राहणारा असून, तो काहीच कामधंदा करीत नाही. सायकलसह इतर किरकोळ वस्तू चोरी करून मिळेल त्या किंमतीत तो त्या विक्री करतो. यातूनच दारू, गांजा, सोल्युशनची नशा करतो. नशेत असताना शुक्रवार, 13 मे रोजी त्याने पहाटे आदर्श नगरातील जय गुरुदेव अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये दुचाकी पेटवली. यानंतर सात वाहने पेटवली. यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याने वाहने जाळल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय खैरे, रेवानंद साळुखे, संजय सपकाळे, रवींद्र चौधरी, जितेंद्र तावडे, सुशील चौधरी, प्रवीण जगदाळे, अजय सपकाळे यांच्या पथकाने केली आहे.