जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश !

0

टंचाईशी मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज

पालक सचिव राजेशकुमार मीणा यांनी घेतला दुष्काळाचा आढावा

जळगाव: जिल्ह्यात पाणी टंचाई, दुष्काळ आहे. त्यावर जिल्हा प्रशासन उपाययोजना केल्या आहे. सोबतच नवीन योजना तयार करण्यात आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. कितीही टंचाई असू देत सामना करून नागरिकांना पाणी, जनावरांना चारा देण्यात प्रशासन सज्ज असल्याची माहिती पालकसचिव, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार मीणा यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार बुधवारी १५ रोजी पालकसचिवांनी जिल्हाधिकारी कार्यालयात चारा व पाणी टंचाई बाबत आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा परिषदेचे सीइओ डॉ.बी.एन. पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी वामन कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, उपवनसंरक्षक दिगंबर पगार, संजय म्हसकर, बी. ए . बोटे, कार्यकारी अभियंता सु.चै.अहिरे, कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी, तहसीलदार मंदार कुलकर्णी आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. टंचाई आराखड्यानुसार जिल्ह्यातील 1 हजार 9 गावांना टंचाई जाणवू शकते. अशा परिस्थितीत या गावांचे सर्वेक्षण करून तेथे टंचाई निवारणार्थ कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत सर्वेक्षण करून 7 दिवसात अहवाल सादर करावा.

नवीन स्रोत शोधा
विंधन विहिरी व कूपनलिका घेण्यासाठी पुरेशी जलपातळी असलेली ठिकाणी शोधून निश्चित करावी. टंचाई कालावधीत महावितरण कंपनीने पाणी पुरवठा योजनांची वीज जोडणी खंडित करू नये. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाहणी करून टँकर भरण्यासाठी पर्यायी उद्भव निश्चित करून ठेवावे. सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी पर्यायी स्रोत शोधून ठेवावे. आवश्यकता भासल्यास विंधन विहीर, कूपनलिका अधिग्रहण करून त्या सील करून ठेवावे.

चारा छावण्या सुरू करा
कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत चार छावण्या सुरू करण्याबाबत नियोजन करावे. मागणीनुसार तत्काळ कामे उपलब्ध करून द्यावेत. गाळ काढण्याच्या कामांमध्ये पाणी पुरवठ्याचे स्रोत प्राधान्याने घ्यावेत. रोहयो अंतर्गत वनीकरण, रोपवाटिका इत्यादीची कामे तत्काळ सुरू करावी. यामुळे टंचाई कालावधीत हातांना रोजगार उपलब्ध होईल.

फक्त पिण्यासाठी पाणी राखीव
जिल्ह्यातील भविष्यातील तीव्र स्वरूपाची पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा फक्त पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवावा. रावेर, यावल, चोपडा तालुक्यातील कमी होणार्‍या भूजल पातळीबाबत भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पाटबंधारे विभाग, कृषी विभाग यांनी एकत्रित समन्वयाने या तीन तालुक्यात जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे घ्यावीत.

प्रांताधिकारी कार्यालयात हेल्पलाइन
जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती निवारण्यासाठी प्रत्येक उपविभागीय कार्यालयात हेल्पलाइन क्रमांक सुरू करावा. जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी नागरिंकाना त्यांच्या सूचना व तक्रारी दाखल करता याव्यात यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय कार्यालयात हेल्पलाइन क्रमांक सुरू करावा. जेणेकरून नागरिक या क्रमांकावर संपर्क साधू शकतील. नागरिकांना पिण्यासाठी पाणी, जनावरांना पिण्याचे पाणी व चारा, मागेल त्याच्या हाताला काम देण्यास प्राधान्य देण्याचे आदेश पालकसचिवांनी दिले.