जिल्ह्यात दोन ठिकाणी अपघात

0

अमळनेर/चाळीसगाव । रविवारी 16 रोजी जिल्ह्यात दोन ठिकाणी वेगवेगळे अपघात झाले. यात एक 7 वर्षीय बालीका ठार झाली असून 33 जण जखमी आहे. पहिल्या घटनेत चाळीसगाव शहरात धुळेकडे जाणार्‍या मारुती फियाट कारला समोरुन येणार्‍या ट्रकने धडक दिल्याने कारमधील चालक जखमी झाला तर 7 वर्षीय बालीका अश्‍विनी बालाजी बडे ही दगावली आहे. जखमीला धुळे येथील सुधा हॉस्पीटलला दाखल करण्यात आले आहे. याबाबत सुवर्णा बालाजी बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रक चालकावर मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसर्‍या घटनेत अमळनेर तालुक्यातील पातोंडा बसस्थानकाजवळ दुपारी 2 वाजता दोन एसटी बस गाड्याची समोरासमोध धडक झाल्याने अपघात झाला. यात 32 प्रवाशी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींना रुग्णालयात दाखल
इगतपुरी आगाराची नाशिक-चोपडा (एमएच 14-बीटी 4178) व चोपडा आगाराची चोपडा-धुळे शटल बस (एमएच 20-बीएल 1408) या दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली. अपघात होताच ग्रामस्थांनी जखमींना पातोंडा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र ते बंद असल्याने जखमींना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहे. यात काहींना जबर मार बसला आहे.

हे आहेत जखमी
जखमींमध्ये लिलाबाई बन्सीलाल पाटील (60 रा.खर्डी), कामिनी नवल चौधरी (20 भराडी), मीराबाई देवीदास चौधरी (चोपडा), गोपाल देवीदास चौधरी (35 चोपडा), मनोज धर्माधिकारी (45 धुळे), पंढरीनाथ आत्माराम महाजन (27, सुरत), सुरेश पुरुषोत्तम पुराणिक (72 धुळे), राहूल संतोष गुंतवणे (23 चोपडा), वासुदेव सुकलाल कोळी (40 मांजरोद), दिनकर आनंदा भदाणे (79 पातोंडा), सुनील कंवरलाल जैन (45 चुंचाळे), विष्णू तुफान पावरा (6 आमल्यापाणी), जानकीबाई तुफान कोळी (25 आमल्यापाणी), इंदूबाई आनंदराव कोळी (45 वढोदा), भिकन गोविंदा पाटील (40 कोंढावळ), ज्योत्स्ना रमेश पाटील (40 महिंदळे ), आशाबाई अभिमन पाटील (45 महिंदळे ), रजूबाई भास्कर पाटील (50 हिसाळे), संजय उखडरू शिंदे (25 नागलवाडी), विमलबाई नामदेव बागूल (45, मालेगाव), पार्वताबाई सहादू धमाळ (62 चोपडा), विमलबाई संतोष भिल (45 जानवे), विजय पाटील, मनीषा पाटील (30 अमळनेर), सचिंद्र जाधव (25 नरवाडे) आदींचा समावेश आहे. या जखमींपैकी एकाला धुळ्याला हलविण्यात आले आहे. डॉ. प्रकाश ताळे, डॉ. जी.एम.पाटील आदींनी उपचार केले.

अशी घडली घटना
चाळीसगाव धुळे महामार्गावरील तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ घटना घडली. लातूर येथून राजकोटकडे जाण्यासाठी बालाजी हरिश्चंद्र बडे हे पत्नी सुवर्णा, मुलगी अश्विनीसह मारुती फियाट जी.जे 10 डी.आर 8112 ने जात असतांना भरधाव येणार्‍या ट्रक एम.पी.09 7370 ने कारला समोरुन जबर धडक दिली.
बालाजी हरिश्चंद्र बडे (40) रा.धानोरा जिल्हा लातूर यांच्या छातीला जबर मार लागल्याने ते जखमी झाले. परिवाराचा अपघात झाल्याने परिवारावर दुःख कोसळले आहे. जखमींना जबर मार लागला आहे.