दीर्घ आजाराने औरंगाबादेत निधन
औरंगाबाद : दलित विचारवंत आणि ज्येष्ठ साहित्यिक, संपादक डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे यांचे मंगळवारी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. औरंगाबादमधील माणिक रुग्णालयामध्ये मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. पानतावणे यांच्या अचानकपणे जाण्याने साहित्यिक तसेच राजकीय विश्वातून हळहळव्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराशी झूंज देत होते. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना पुरस्कार स्वीकारता आला नव्हता. 2009 साली अमेरिकेतील सान होजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. दलित साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी केलेले बरेचसे लेखन हे दलित साहित्याच्या अनुषंगाने असेच आहे.
अस्मितादर्शने इतिहास घडविला
गेल्या काही महिन्यांपासून डॉ. पानतावणे आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने इलाज सुरु होते. गेल्या आठवड्यामध्येच त्यांना भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारानेदेखील गौरवण्यात आले होते. परंतु त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती वेगाने ढासळू लागली. त्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. या दरम्यान प्रकृतीत सुधारणा व्हावी, म्हणून डॉक्टरांकडून सर्व प्रकारचे प्रयत्नदेखील करण्यात आले. परंतु औषधांचा कसलाही फरक न पडल्यामुळे मंगळवारी पहाटे औरंगाबादेतील माणिक रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. पानतावणे यांचा जन्म 28 जून 1937 साली नागपूर येथे झाला होता. डी. सी. मिशन स्कूल येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. तर नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल नागपूर येथे माध्यमिक शिक्षण झाले. 1956 साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूर महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. आणि एम. ए. ची पदवी मिळवली. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पी. एच. डी. ची पदवीही मिळवली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. अस्तितादर्श या नियतकालिकाच्या संपादकपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारीही त्यांनी घेतली होती. तसेच दलित आत्मकथा, दलित साहित्य, चर्चा आणि चिंतन, लोकरंग, स्त्री आत्मकथन, महारांचा सांस्कृतिक इतिहास हे त्यांनी संपादन केलेले काही ग्रंथ. चळवळीला वैचारिक अधिष्ठान देणारे नियतकालिक म्हणून अस्मितादर्शकडे पाहिले जाते.
विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त…
डॉ. पानतावणे यांनी विविध विषयांवर विपूल लेखन केले. दलित साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी केलेले बरेच लेखन हे दलित साहित्याच्या अनुषंगाने असेच आहे. त्यापैकी धम्मचर्चा, मूल्यवेध, मूकनायक, विदोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाडमय, किल्ले पन्हाळा ते किल्ले् विशाळगड, साहित्य, प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य शोध आणि संवाद हे सर्व ग्रंथ अत्यंत गाजले. साहित्यातील त्यांच्या भरीव योगदानासाठीच त्यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कारदेखील देण्यात आला होता. त्यांच्या निधनाने साहित्यिक विश्वाबरोबरच राजकीय क्षेत्रातूनदेखील दु:ख व्यक्त केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे यांनीदेखील पानतावणे यांच्या जाण्यावर दु:ख व्यक्त केले आहे. आपल्या साहित्याच्या माध्यमातून दुर्बल वंचितांच्या न्यायासाठी लढणारे पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या निधनाने आपण एका जेष्ठ विचारवंतास लेखकास मुकलो आहोत, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली आहे.
अभिव्यक्तीचे सकस, दर्जेदार वाङ्मयीन मुखपत्र म्हणून सातत्याने आणि व्रतस्थपणे चालवल्या गेलेल्या ’अस्मितादर्श’ या नियतकालिकातून डॉ.गंगाधर पानतावणे यांनी हजारो वर्षांपासूनच्या मूक अभिव्यक्तीला जे विचारपीठ निर्माण करून दिले ते केवळ मराठी वा भारतीय संदर्भातच नव्हे तर जागतिक संदर्भातच मोलाची व ऐतिहासिक महत्वाची सांस्कृतिक घटना आहे. आज अनेक मान्यवर आणि नामवंत असणार्या लेखक, कवींना त्यांनी बोट धरून उभे केले. समाजाचा एक मोठा वाङ्मयीन, सांस्कृतिक पालक व आमचे अतिशय जवळचे ज्येष्ठ स्नेही त्यांच्या जाण्याने आपण गमावून बसलो आहे.
– श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ