रांची: झारखंड राज्यात आज विधानसभा निवडणूक होत असून, पहिल्या टप्प्यात १३ जागांवर मतदान सुरु आहे. मतदानादरम्यान गुमला जिल्ह्यात नक्षली हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. बिशुनपूरमध्ये नक्षलवाद्यांनी पूल उधवस्त केला आहे. मात्र, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पोलीस उपायुक्त शशी रंजन यांनी या हल्ल्यामुळे मतदानावर परिणाम झालेला नसून मतदान अजूनही सुरू असल्याची माहिती उपायुक्त शशी रंजन यांनी दिली आहे.
झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे, ३७ लाख ८३ हजार ५५ मतदार १८९ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणूक ही पक्षांतर करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा असल्याचे मानले जात आहे. या मुळे अशा बर्याच उमेदवारांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
ही निवडणूक भाजप आणि विरोधी पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे म्हटले जात आहे. सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप जोरदार दबाव आणत असताना, रघुबर सरकारला मात देण्यासाठी विरोधक जोरदार प्रयत्न करत आहेत. या टप्प्यात निवडणूक लढविणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये झारखंडचे आरोग्यमंत्री रामचंद्र चंद्रवंशी, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर ओरावण आणि माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भानु प्रताप शाही आहेत.