डम्पिंग ग्राऊंडवरील चिमुकल्यांसाठी बालभवन

0

कल्याण । शिकल्याशिवाय वंचितांची प्रगती होणार नाही हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूलमंत्र प्रत्यक्ष आचरणात आणून त्यांना अनोखी मानवंदना देण्यात आली आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या डम्पिंग ग्राऊंडवरील चिमुकल्यांसाठी बालभवनची सुरुवात करण्यात आली आहे. जन्मापासूनच कचरा हेच खेळणे आणि कचर्‍याचा डोंगर हेच खेळाचे मैदान, अशी येथील चिमुकल्यांची परिस्थिती आहे. या चिमुरड्यांना हे सर्व संस्कार-शिकवण देण्यासाठी सध्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचेच भाऊबंद सज्ज झाले आहेत. कधीकाळी त्यांचे बालपणही असेच कचर्‍याच्या सानिध्यात गेले होते.

आणखी तीन ठिकाणी उपक्रम सुरू करणार
अनुबंध संस्थेने शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना आपल्या पायावर सक्षमपणे उभे राहण्याचे बळ दिले आहे. त्यांनीही आपल्या दुसर्‍या पिढीलाही मुख्य प्रवाहासाठी सक्षम करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी राहुल साबळे, महादेव घुले, प्रीती ढगे, प्रभाकर घुले आणि रवी रतन घुले या तरुणांनी विशेष प्रशिक्षणही घेतले आहे, अशी माहिती अनुबंध संस्थेच्या प्रमुख प्राध्यापिका मीनल सोहनी यांनी दिली. समाजसेवक विजय पंडित यांच्या सहकार्याने हा उपक्रम सध्या सोनवणे कॉलेजात सुरू करण्यात आला आहे. आणखी तीन ठिकाणीदेखील हा उपक्रम लवकरच सुरू होणार आहे.

कृती शिक्षणाची जोड
युवा उद्योजक मंदार घोडके, मयूरेश सरोदे, यांच्यासह विशाल जाधव, विशाल कुंटे, सूर्यकांत कोळी आदींच्या उपस्थितीत या उपक्रमाला प्रारंभ झाला. कचर्‍यात खेळताना त्यांचे आयुष्य कचरा होऊ नये, म्हणून या चिमुरड्यांमध्ये लहानपणापासूनच चांगल्या सवयी लागाव्या, खेळाची व व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर उच्चार स्पष्ट होऊन बोलणे सुधारावे व चांगल्या जीवन पद्धतीची त्यांना आतापासूनच ओळख होण्याच्या दृष्टीनेही सर्वंकष प्रयत्न केले जाणार आहेत. मलहान मूल म्हणजे मातीचा गोळा, त्याला आकार द्याल तशी मूर्ती घडेल या उक्तीला अनुसरून बालभवनमध्ये कृती शिक्षणाची जोड देण्यात आली.