नंदुरबार/नवापूर :‘बडे डाक खाने से आता लाता कभी रुपय्या, कभी किताबें दे जाता है मुझको हस हस भैय्या’ बालपणीच्या कवितेतील मुन्शीराम डाकियाचे वर्णन आठविण्याचे कारण म्हणजे आजच्या ‘डाकिया’ने संचारबंदीच्या काळात ग्रामीण जनतेला दिलासा दिला आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून पोस्टाचे प्रतिनिधी गावात जावून पैसे वाटप करीत आहे. आठवड्याभरात 2 हजार 392 खातेदारांना 32 लाख 72 हजार रुपयांचे वितरण केले आहे.
डाकसेवेच्या उपयुक्तता तंत्रज्ञान युगात कमी होते की काय, अशी शंका वाटत असताना या विभागाने कात टाकून नवे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. नव्या सेवांचा समावेश आपल्या कामकाजात करून वेळोवेळी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. कोरोनाच्या संकटवेळी बँकेतील गर्दी टाळणे आवश्यक असताना इंडियन पोस्ट पेमेंट बँकेने गावपातळीवर आपले काम नेऊन नागरिकांना चांगली सेवा दिली आहे.
केवळ आधार कार्ड आणि मोबाईल जवळ असला तरी नागरिकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना किंवा अन्य योजनेच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यात जमा झालेली रक्कम काढता येत आहे. इतर सार्वजनिक बँकांमधील रक्कमही काढण्याची सुविधा गावपातळीवर उपलब्ध झाली आहे. या सुविधेसोबत सार्वजनिक बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्राच्या 170 प्रतिनिधींमार्फत गावपातळीवर रक्कम काढण्याची सुविधा करून देण्यात आली आहे. त्यामुळे 54 हजार 958 खात्यातील 4 कोटी 35 लाख रुपये वितरित करण्यात आले आहे.
नागरिकांचा त्रास वाचला
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शाखेतून प्रतिनिधी परिसरातील 3 ते 4 गावात जाऊन ही सुविधा देतात. एकावेळी 1 हजार रुपये काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक प्रतिनिधी एका दिवसात 25 हजार रुपयांचे वितरण करू शकतो. गावात अधिक ग्राहक असल्यास सर्व ग्राहकांना पैसे वितरीत होईपर्यंत गावातही सुविधा दिली जाते. त्यामुळे शहरात बँकेतील गर्दी कमी होण्याबरोबर नागरिकांचा त्रास वाचला आहे. विशेषत: गरजू महिला आणि वृद्धांना या सुविधेचा चांगला उपयोग होत आहे. त्यामुळे गावात पूर्वीसारखी ‘डाकिया’ची वाट पाहिली जात आहे.