डिसेंबरपासून मुंबई-गोवा सागरीमार्गावर फेरीबोट

0

नवी दिल्ली । मुंबई-गोवा दरम्यान रस्ता वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबई ते गोव्या दरम्यान फेरीबोट सेवा सुरु केली जाणार आहे. केंद्रीय जल वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासंबंधी सविस्तर माहिती दिली. या बोटींमधून प्रवासी आणि कार्गो वाहतूकही केली जाणार असून त्यामुळे वेळ वाचणार आहे, शिवाय प्रदूषणही कमी होणार असल्याचा विश्‍वास गडकरी यांनी व्यक्त केला. दाबोळी आणि मोपा विमानतळ जलमार्गाने जोडण्याच्या शक्यतेवर विचार सुरु असून गोव्यात जलमार्ग विकसित करताना पर्यावरणाचे भान राखले जाणार असल्याचेही गडकरींनी स्पष्ट केले.

गोव्यात विरोध झाल्यास सिंधुदुर्गला पसंती
मोठ्या हॉटेल्सनी तरंगत्या जेटी करुन पर्यटकांना जलमार्गावरुन थेट हॉटेलमध्ये प्रवेश द्यावा, असाही विचार आहे. गोव्यात ज्या प्रकल्पांना विरोध होईल ते प्रकल्प गोव्या शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेले जातील, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. नद्यांचे राष्ट्रीयकरण केले जाण्याबाबत जे गैरसमज पसरवले जात आहेत, ते पूर्णतः चुकीचे असल्याचे गडकरी म्हणाले. केवळ जलमार्ग अधिसूचित केले जाणार आहेत. ते झाल्याशिवाय आपल्या खात्याला त्यावर पैसे खर्च करता येणार नाहीत. नद्या गोव्याच्या मालकीच्या असून त्या मी बॅगेत भरुन दिल्लीला नेणार नसल्याची कोपरखळीही गडकरी यांनी यावेळी मारली.

पर्यटक अधिक संख्येने या जलमार्गाकडे आकर्षित होतील
याआधीही बर्‍याच वर्षांपूर्वी मुंबई-गोवा दरम्यान जलमार्ग सुरू होता. मात्र अचानक एक बोट बुडाल्याने हा जलमार्ग बंद करण्यात आला, त्यामुळे या दरम्यान जलमार्गाची यापूर्वीपासून ओळख आहे. तेव्हा या मार्गावरील जलमार्गाला बराच प्रतिसाद मिळत होता. आताही या मार्गाला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास व्यक्त होत आहे. मात्र अधिक वेळकाढू मार्ग असल्यामुळे या मार्गाकडे पर्यटक अधिक संख्येने आकर्षित होऊ शकतात, अशी शक्यता आहे.