ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या’, अण्णांची फडणवीस यांच्यावर टीका

0

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे चांगले मुख्यमंत्री मिळाले म्हणुन आपण कौतुक करत होतो. मात्र, सत्तेत येऊन चार वर्ष झाली तरी लोकायुक्त कायदा झाला नाही. ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला, अशी टीका करत अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यावर निशाना साधला. राळेगण सिध्दी येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये हजारे बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप चांगले आहेत असे मला वाटत होते. मात्र, खुर्ची हातात आल्यानंतर ते देखील बदलले असे अण्णा हजारे यांनी म्हंटले आहे. लोकायुक्ताच्या मुद्द्यावरुन येत्या ३० जानेवारीला राळेगण सिध्दी येथे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी अण्णांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीमधून आंदोलनाची दिशा काय असणार आहे? यावर चर्चा करण्यात आली. दरम्यान, या मुद्द्यावर देशभरातील कार्यकर्त्यांची २४ जानेवारीला राळेगण सिध्दी येथे बैठक होणार आहे. यावर देखील बैठकीत चर्चा करण्यात आली.