पुणे । गणेशोत्सवात पाश्चिमात्य संगीताच्या नादावर, डीजेवर थिरकणारी तरुणाई आपण गेल्या काही वर्षांपूर्वी पाहत होतो. मात्र, ढोलताशा पथकांनी पारंपरिक वाद्यांतून गणेशोत्सवाला मांगल्याचे स्वरूप दिले आहे. ढोलताशा पथकांनी केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित राहू नये. सामाजिक भावनेतून विविध उपक्रमात सहभागी होऊन समाजकार्यात भाग घ्यावा, असे प्रतिपादन पुणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी केले. स्वराज्य ढोल पथकाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ’स्वराज्य सन्मान पुरस्कार’ सोहळ्यात मुरलीधर मोहोळ बोलत होते. याप्रसंगी शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष महेश लडकत, नगरसेविका हर्षाली माथवड, वासंती जाधव, ढोल ताशा महासंघाचे शिरीष थिटे, पथकाचे अध्यक्ष प्रसाद चिपाडे, मंदार राजवाडे, पराग काटे, रवी रोकडे, प्रेम क्षीरसागर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
आदिवासी भागात कुपोषण, आरोग्याचा प्रश्न मोठा आहे. त्यांच्या पदरी दारिद्रय, गरीबी आणि बिकट जीवन आलेले आहे. त्यांच्या आयुष्यात थोडाफार बदल व्हावा, यासाठी गेली 18 वर्षे काम करीत आहे. तिथल्या मुलांना चांगले शिक्षण व इतर सोयी पुरविण्याचा प्रयत्न करतो आहे. युवकांनी ग्रामीण भागातील, आदिवासी पाड्यांतील लोकांचे जीवन सुधारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे डॉ. पुरुषोत्तम आगाशे यांनी सांगितले. जगातील सर्व शिखरांवर शिवाजी महाराजांना घेऊन जायचे आहे. शिवप्रेमींनी या मोहिमेसाठी सहकार्य करावे. गिर्यारोहकांना प्रोत्साहीत करण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा, असे अनिल वाघ यांनी सांगितले.
समाज कार्यात सहभाग घ्या
वाद्यपथक म्हणून वर्षभर कार्यरत राहिले पाहिजे. समाजहिताच्या कार्यात सहभाग घेतला पाहिजे. समाजातल्या दुर्बल घटकांसाठी काम केले पाहिजे. स्वराज्य ढोल पथकाने गेल्या दहा वर्षात केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे, असे मोहोळ यांनी सांगितले. आदिवासींसाठी काम करणार्या आगाशे, शिवप्रेमी वाघ यांचा सत्कार करून एक चांगला आदर्श या पथकाने ढोल पथकांसमोर ठेवला आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.
ग्रामभारती संस्थेला संगणक भेट
पत्रकारभवनमध्ये झालेल्या या सोहळ्यात जव्हार मोखाडा आदिवासी भागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ’ग्रामभारती समाज परिवर्तन संस्थेचे डॉ. पुरुषोत्तम आगाशे, तसेच आफ्रिका येथे 9 शिखरांवर सायकलस्वारी करून किलीमांजरो येथे शिवजयंती साजरी करण्यासाठी जाणार्या अनिल वाघ यांना ’स्वराज्य सन्मान पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, शिवाजी महाराजांची मूर्ती आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी ग्रामभारती संस्थेला संगणक भेट देण्यात आला.