तरच जलसंपदा विभाग दुरुस्ती करेल – प्रा. बानगुडे

0

पुणे : महापालिकेने पर्वती ते लष्कर या जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करावे. या जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यास जलसंपदा विभागाला कालव्याची दुरुस्ती करता येईल, अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी दिली.

हिंगणे ते खडकवासला धरणापर्यंत कालव्याची पाहणी प्रा. बानगुडे पाटील यांनी शुक्रवारी केली. दरम्यान या पाहणीत आढळलेल्या दोष, त्रुटींबाबत महामंडळाला अहवाल सादर करणार असल्याचे सांगून प्रा. बानगुडे म्हणाले, शहराची लोकसंख्या वाढत असल्याने कालवा आता शहराच्या मध्यभागातून जात आहे. कालव्याचे आयुर्मान 50 वर्षापेक्षा जास्त झाले असल्यामुळे त्याची पडझड झाली. भरावाच्या भिंती पडल्या आहेत. त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. अशा सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

एकत्रित जबाबदारीने काम करावे

महापालिकेने पर्वती ते लष्कर या जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करावे, म्हणजे आम्हाला कालव्याची दुरुस्तीदेखील करता येईल. नागरिकांनी कालव्यात अन्न, कचरा पाण्यात टाकू नये. हे उंदीर आणि घुशीसाठी खाद्य असते. त्यामुळे, त्याच भागात जास्त वास्तव्य आढळते. उंदीर-घुशीच्या बिळांमुळे भरावात पोकळी निर्माण होते. यामुळे पाणी भगदाड पडण्याच्या अनेक लहान मोठ्या घटना नेहमीच या परिसरात घडतात. हडपसर ते फुरसुंगी यादरम्यान कालवा बंदिस्त झाला पाहिजे. बोगदा काढून शहराबरोबर पाटबंधारे प्रस्ताव तयार केला असून त्यासाठी निधी आणण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे प्रा. बानगुडे पाटील यांनी सांगितले. कालवा फुटण्यासारख्या दुर्घटना घडू नये म्हणून पाटबंधारे विभागाबरोबर कालव्याच्या सुरक्षेबाबत महापालिकेनेदेखील जबाबदारीने एकत्रित काम करावे, असे आवाहन प्रा. बानगुडे पाटील यांनी केले.