रावेर : तालुक्यातील ताडजीन्सी शिवारातील एका आदिवासी बांधवांच्या घराला लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्या तसेच एका गायीचाही मृत्यू झाला. सुदैवाने दोन्ही बालके शेजारी झोपलेली असल्याने मोठा अनर्थ टळला. तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आगीमुळे सुमारे 80 हजार रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जीन्सी शिवारातील ताडजीन्सी येथील गट क्रमांक 104 या शेतात राहत असलेला चामरसिंग माठ्या भिलाला व त्यांच्या पत्नी दुसर्यांच्या शेतात कामासाठी गेलेले होते तर त्यांची 4 व 5 वर्षांची दोन्ही मुले घरापासून थोड्या लांब अंतरावर असलेल्या शेजार्याकडे झोपलेली होती. त्यामुळे ती सुदैवाने वाचली आहेत. रविवारी दुपारी चारच्या सुमारास अचानक चामरसिंगच्या घराला आग लागून आगीत संपूर्णघर व संसारोपयोगी साहित्य जाळून खाक झाले आहे याच ठिकाणी दोन गाई व दोन बैल बांधलेले होते. मात्र आगीच्या झळा लागल्याने बैलांनी व एका गायीने दोर तोडल्याने ते वाचले असून एका गाय आगीच्या भक्षस्थानी पडल्याने तिचा मृत्यू झाला. प्रशासनाने या कुटुंबाला पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.