मुंबई : वरळी, बीडीडी चाळीच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून काढण्यात आलेल्या निविदेला तिसर्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या निविदाप्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याने वारंवार मुदतवाढ देण्यात येत असल्याची चर्चा म्हाडात सुरू आहे. परंतु, म्हाडाच्या उच्चपदस्थ अधिकार्यांनी त्याला नकार देत निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होणार्या कंपन्यांना काही तांत्रिक अडचणी असल्याने आणि कंपन्यांना मुदतवाढ हवी असल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
दुसरी मुदतवाढ संपण्याआधीच…
एप्रिलमध्ये वरळीतील पुनर्विकासासाठी मुंबई मंडळाकडून निविदा मागवण्यात आल्या. पण या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने निविदेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. दुसरी मुदतवाढ 17 जुलै रोजी संपणार होती. त्याचआधीच मुंबई मंडळाने निविदेला दहा दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
सर्वाधिक विरोध वरळीतूनच
त्यानुसार आता कंपन्यांना 27 जुलैपर्यंत निविदा सादर करता येणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे निविदेला मुदतवाढ देण्यात येत असल्याचे मुंबई मंडळाकडून सांगितले जात असले तरी कंपन्या या प्रकल्पासाठी पुढे येण्यास कचरत असल्याची चर्चा आहे. कारण, वरळी सर्वाधिक इमारती असून वरळीतूनच सर्वात मोठा विरोध म्हाडाला आणि बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाला होतो आहे. त्यामुळे बिल्डर निविदा सादर करण्यास पुढे येत नसल्याचे म्हटले जात आहे.
मंदीमुळे निविदेला प्रतिसाद नाही
सध्या मंदीचे वातावरण असल्याने परिणामी निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे म्हटले जात आहे. त्याचवेळी निविदेत अनेक अटी असल्याने या अटींमुळेही बिल्डर निविदा सादर करण्यास उत्सुक नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे 27 जुलैपर्यंत तरी निविदेला प्रतिसाद मिळेल की पुन्हा मुदतवाढ देण्याची वेळ मुंबई मंडळावर येईल, हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल.