पिंपरी । तुमची संघर्षयात्रा तर तर आम्हीही संवादयात्रा काढू, शेतकर्यांच्या आजच्या परिस्थितीला जे जबाबदार आहेत, ते संघर्षयात्रा काढत आहेत. केवळ संघर्ष नाव दिल्याने संघर्ष होत नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. पिंपरीत भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचा समारोप झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
आम्ही एसी बसमध्ये जाणार नाही
केवळ नाव दिल्याने संघर्षयात्रा होत नाही, संघर्षयात्री ती होती, जी गोपीनाथ मुंडेंनी काढली. ज्यांच्या संघर्षयात्रेने सत्ताधार्यांना शह देऊन परिवर्तन घडवले होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकर्यांना माहिती आहे, आमचे जे नुकसान झालंय ते फक्त यांच्यामुळेच झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांचाही या संघर्षयात्रेला फारसा प्रतिसाद नाही. असे विरोधकांपैकीच काही जण मला येऊन सांगतात, असा घणाघातही मुख्यमंत्र्यांनी केला. आम्ही राज्यातल्या 25 लाख शेतकर्यांपर्यंत पोहचू, त्यांच्या समस्या जाणून घेऊ आणि त्यांना सरकारी योजनांची माहिती देऊ, शिवाय यासाठी आम्ही एसी बसमध्ये जाणार नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. आमचे आमदार, खासदार आणि सर्व पदाधिकारी शेतकर्यांशी शिवारावर जाऊन संवाद साधतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
लोकांनी टाकलेला विश्वास कायम ठेवा
लोकांचा विश्वास मिळवणे हे सोपे आहे, मात्र तो टिकवणे अवघड आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आतापर्यंत सत्तापरिवर्तनासाठी काम केले. मात्र आता लोकांनी आपल्यावर विश्वास टाकलाय. त्यामुळे आता सत्ता परिवर्तनासाठी नव्हे, तर समाज परिवर्तनासाठी काम करा, कुठल्याही पदाचा अहंकार आला तर लोक आपल्याला आपली जागा लगेच दाखवतात. पिंपरीत पवारांचा बुरुज कोसळला, सोलापुरात मोहिते पाटलांचा बुरुज कोसळला, तसंच सांगली, कराड, इस्लामपूरसह राज्यभरात हीच परिस्थिती आहे. हे लोकांपासून दूर गेले आहेत. त्याचा हा परिणाम आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.