‘ते’ एकमेकांना समजून घेण्यात कमी पडले

0

हिंदू-मुस्लीम समाजाविषयी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केली खंत

12 व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

पुणे : भारतीय समाज संमिश्र स्वरूपाचा आहे. हिंदू-मुस्लीम समाजामध्ये हजारो वर्षांचा संपर्क आहे. कटुता, युद्ध, संघर्ष, वादळाचा आणि स्नेह, मैत्री, जिव्हाळ्याचाही तो संपर्क आहे. भूतकाळातून काय घ्यायचा, भावी पिढ्यांना काय वारसा द्यायचा, हे ठरवणे ही आपली आणि साहित्यिकांची जबाबदारी आहे. पण, एकमेकांना समजून घेण्यात हिंदू-मुस्लीम समाज कमी पडले, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह. साळुंखे यांनी व्यक्त केली. धर्माधर्मात, जाती जातीत दुरावा होत आहे, ही चिंतेची बाब आहे. स्नेहाचा मार्ग भावी पिढ्यांना फुलवेल. या मार्गानेच पुढे जावे लागेल. दोन समाज जोडले जाणारे उपक्रम म्हणून हे साहित्य संमेलन आहे, असेही डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आयोजित मुस्लिम मराठी साहित्य चळवळीच्या 12 व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या हस्ते आझम कॅम्पस येथील प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर साहित्यनगरीत झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. अलीम वकील, स्वागताध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, डॉ. विश्‍वनाथ कराड, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, डॉ. शेख इक्बाल मिन्ने, विलास सोनवणे, डॉ. एस.एन. पठाण, नि. व्हा.अ‍ॅडमिरल निजाम नदाफ, प्रा. फ. म. शहाजिंदे, आबेदा इनामदार, लतीफ मगदूम, सय्यदभाई, डॉ. सलीम चिश्ती, अंकुश काकडे उपस्थित होते.

संमेलनात डॉ. विश्‍वनाथ कराड यांना ‘डॉ. अबुल कलाम आझाद सद्भावना पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. जुल्फी शेख, डॉ. मुहम्मद आझम, आबेदा इनामदार, विलास सोनवणे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ‘काफिला’ या स्मरणिकेचे प्रकाशनही झाले.

विघातक काम रोखणे ही सर्वांची जबाबदारी

डॉ. साळुंखे म्हणाले, कोणाच्याही देशावरील निष्ठेचे प्रमाणपत्र मागण्या-देण्याचा नैतिक, संवैधानिक अधिकार नाही. ही भावना देशात असणे गरजेचे आहे. कोणतेही राष्ट्र विघातक काम करीत असेल तर त्याला रोखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. एखाद्या व्यक्तीच्या कृत्यावरून सर्व समाजाला संशयाच्या घेर्‍यात धरता येणार नाही. हजार वर्षांचा संपर्क असूनही आपण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न झाला नाही, ही खंत आहे.

त्यांना मुस्लीम मुक्त भारत करायचा…

डॉ. अलीम वकील म्हणाले, ‘चला संभ्रमित होऊ या’ असाच 2014 पूर्वीचा इतिहास पंतप्रधान मोदींनी सांगितला. पण, इतिहास डस्टरने पुसता येणार नाही. भाजप, संघ परिवाराचे स्वातंत्र्य चळवळीतील एकाही महानायकाशी गोत्र जुळत नाही. काँग्रेसमुक्त भारताबरोबर त्यांना मुस्लीम मुक्त भारत करायचा आहे. संभ्रमित करणार्‍या या काळाचा सामना केला पाहिजे.
डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले, प्रस्थापित साहित्यिकांनी नवोदित तरुणांना वाव द्यावा. नव्या तंत्र स्नेही तरुणांनी कालसुसंगत विचार आधुनिक माध्यमातून मांडावेत. साहित्य हे मानवी संस्कृतीचे प्रकटीकरण असल्याने त्यातून मने जोडण्याचे काम व्हावे.

साहित्यिकांचे पद अजरामर

बापट म्हणाले, समाजातील वाईट गोष्टी उघडकीस आणणे आणि सकारात्मक गोष्टी पुढे आणण्याचे काम संमेलनाने करावे. राजकारण्यांनी सर्व व्यासपीठांवर लुडबूड करू नये, असे मला वाटते. राजकारण्याचे पद एक दिवस जाणार असते, पण साहित्यिकांचे पद अजरामर असते.
स्थानिक भाषांमध्ये आदान-प्रदान महत्त्वाचे आहे. मुस्लीम मराठी साहित्य सर्वांपर्यंत पोहोचवून मानवतावादी कार्य करण्यास या संमेलनाचा उपयोग होईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.