आठ लाख पर्यटक किनारी भागात दाखल
अलिबाग : राज्याबरोबरच परराज्यांतील पर्यटकांचे क्रेझी डेस्टिनेशन असणारे रायगड जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारे पर्यटकांनी आता पूर्णपणे फुलले आहेत. नाताळच्या सुट्टीबरोबरच थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मुक्कामी आलेल्या पर्यटकांमुळे किनारी भागातील रिसॉर्ट आणि हॉटेल्स 100 टक्के हाउसफुल्ल झाले असून सुमारे 8 लाख पर्यटक किनारपट्टीत दाखल झाले असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकार्यांकडून देण्यात आली आहे. तसेच यंदा ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून 60 टक्के बुकिंग झाले आहे. रायगडमधील हॉटेल व्यावसायिकांनी विविध आकर्षक सवलती पर्यटकांकरता जाहीर केल्याने पर्यटकही चांगलेच सुखावले आहेत.
मुंबई-पुण्याच्या पर्यटकांना समुद्रकिनारी नाताळ आणि थर्टी फर्स्ट साजरा करण्यात मोठी रुची असते, हे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून दिसून येत आहे. परिणामी मांडवा, सासवणे, थळ, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशीद, नांदगाव, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन आदी ठिकाणच्या समुद्रकिनारी शुक्रवारपासूनच पर्यटकांची गर्दी झाली आहे. अलिबागसह किनारी भागात महोत्सवाची पर्वणी पर्यटकांना उपलब्ध होत आहे.
नाताळसाठी गोव्यात जाण्यासाठी मोठा प्रवास आणि खर्च यांच्या तुलनेत रायगडच्या किनारपट्टीत पोहोचणे अल्पखर्ची असल्याने पर्यटकांकडून रायगडमधील किनारपट्टीची निवड होत आहे. बड्या हॉटेल्सच्या तुलनेत येथे स्वस्तात दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध होत असल्याची प्रतिक्रिया चाकण येथून अलिबागमध्ये आलेले जगदीश पारकर कुटुंबीयांनी दिली आहे.
सलग सुटी व नाताळमुळे वाहतूककोंडी
नाताळच्या सुटीमुळे पर्यटक मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यातील किनारी भागात दाखल होत आहेत. त्यामुळे माणगाव परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली आहे. या कोंडीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. माणगाव शहरातील पोलीस यंत्रणा कार्यरत असली तरी अरुंद रस्ते, आणि त्यातच चौपदरीकरणाच्या कामामुळे कोंडी सोडवण्यात अडथळे येत आहेत. तसेच माणगाव शहरातून मुंबई-गोवा महामार्गावर निजामपूर पुणे रोड, बामणोली रोड, मोर्बा रोड-दिघी पोर्ट तसेच कचेरी रोड लागून आहे. अरुंद रस्त्यामुळे याठिकाणी गाड्या वळवताना वाहतूककोंडी निर्माण होते. तसेच दिघी पोर्टकडे अवजड वाहने वळवतानाही इतर गाड्या थांबवाव्या लागत असल्याने कोंडीत भर पडते. तशीच अवस्था कचेरी रोड व बामणोली रोडवरही होत आहे. दरम्यान, माणगाव शहरातील वाहतुकीची कोंडी प्रवासी तसेच चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सलग सुटी व नाताळमुळे वाहतूककोंडी ही समस्या माणगाव शहरात नेहमीचीच झाली आहे. यावर ठोस उपाय करण्यात माणगाव शहर पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याचे चित्र आजही पाहावयाला मिळाले आहे.
जंजिरा किल्ला हाऊस फुल्ल
मुंबईतील सर्व शाळांना नाताळची सुटी पडल्याने मुंबईपासून अवघ्या 160 किलोमीटर अंतरावर असणार्या मुरुड व काशीद येथे पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. ऐतिहासिक सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मुंबई व ठाणे येथील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी खोरा बंदराच्या दोन्ही बाजूस पर्यटकांच्या गाड्या दिसत आहेत. पर्यटक जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी शिडांच्या बोटीत मोठ्या संख्येने बसताना दिसत आहेत. राजपुरी नवीन जेट्टी येथे तिकीट घेण्यासाठी मोठी गर्दीच गर्दी दिसत आहे. एकंदर पर्यटकांच्या मोठ्या संख्येने राजपुरी व खोरा बंदरात मोठी गर्दी दिसत आहे.
मद्यपी पर्यटकांची चौकशी
हुल्लडबाज पर्यटकांना नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. त्याचबरोबर बाहेरून येणार्या पर्यटकांच्या वाहनांच्या पार्किंगची समस्या असते. यावरून अनेक वाद होतात. वडखळ, मांडवा, पेझारी, कोलाड नाका, माणगाव येथे चेकपोस्ट करण्यात येत असून मद्यपी पर्यटकांची कसून चौकशी व दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. अनिल पारस्कर, पोलीस अधीक्षक