भाजपमधील दलित खासदारांची नाराजी वाढली
आणखी एका दलित खासदाराचा घरचा आहेर
नवी दिल्ली : दलित अत्याचार तसेच अॅट्रॉसिटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि त्यानंतर देशभरात उसळलेला हिंसाचार यामुळे भारतीय जनता पक्षातील खासदार पक्षावर नाराज आहेत. उत्तर प्रदेशातही भाजपच्या दलित खासदारांची नाराजी वाढत चालली आहे. भाजपाचा मोठा दलित चेहरा म्हणून ओळखल्या जाणार्या उदित राज यांचाही नाराजांमध्ये समावेश आहे. या आठवड्याच्या सुरूवातीला भारत बंदच्या दरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनानंतर देशातील विविध भागांमध्ये दलित समाजाच्या नागरिकांवर अत्याचार होत आहे, असे उदित राज म्हणाले आहेत. या खासदारांची नाराजी भारतीय जनता पक्षासाठी आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपामधील श्रेष्ठींनी दलित खासदारांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी दलित खासदारांशी संवाद साधणार आहेत.
पोलिसदेखील मारहाण करीत आहेत
उदित राज यांनी म्हटले आहे की, दोन एप्रिल रोजी झालेल्या आंदोलनात सहभागी होणार्या दलितांवर अत्याचाराच्या बातम्या येत आहेत, पण हे थांबायला हवे. दोन एप्रिलनंतर देशभरात दलितांवर अत्याचार होत आहेत. बाडमेर, जालोर, जयपूर, ग्वालियर, मेरठ, बुलंदशहर, करोली आणि अन्य ठिकाणी अशाप्रकारच्या घटना होत आहेत. केवळ आरक्षणविरोधी लोकच नव्हे तर पोलिसदेखील मारहाण करीत आहेत, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवले जात आहे, असा आरोप राज यांनी केला. यापूर्वी, सावित्रीबाई फुले (बहराईच), छोटेलाल खरवार (रॉबर्ट्सगंज) अशोक कुुमार दोहरे (इटावा) आणि यशवंत सिंग (नगिना) या चार खासदारांनी आपली नाराजी, संताप जाहीरपणे व्यक्त केला आहे. त्यांनी दलितांच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे.
भाजपाचे दलित खासदार स्वार्थी : मायावती
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत भाजपावर टीका केली. भारत बंद यशस्वी झाला आणि त्यामुळेच भाजपा घाबरला आहे. आता दलितांचे शोषण सुरु झाले असून तरुणांना खोट्या केसेसमध्ये अडकवले जात आहे. दलित समाजाने याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करावी, असे आवाहनही मायावतींनी केले. भाजपाच्या दलित खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले होते. यावरुनही मायावतींनी निशाणा साधला. भाजपाचे दलित खासदार स्वार्थी मानसिकतेचे आहेत. देशातील जनता या खासदारांना ओळखून आहे. आगामी निवडणुकीत दलित समाज त्यांना माफ करणार नाही, असेही त्या म्हणाल्या. बसपची सत्ता आल्यास दलितांवरील गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.