मुंबई-मध्य रेल्वेच्या दादर स्टेशनला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे. मात्र याला भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विरोध दर्शवला आहे. दादर या भागाला ऐतिहासिक महत्त्व असून अशा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणांची नावे बदलू नये, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.
६ डिसेंबरपूर्वी दादर स्थानकाचे नामांतर करावे, अशी मागणी करणारे निवेदन भीम आर्मीने रेल्वे प्रशासनाला दिले होते. आज भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी दादर स्थानक परिसरात ठिकठिकाणी पत्रके लावून स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस हे नाव द्यावे, अशी मागणी केली होती.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मुंबईला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सात बेटांचे हे शहर असून दादर, माहीम, कुलाबा अशा ठिकाणांचे नाव बदलू नये. नव्या पिढीसमोर या जागांचे ऐतिहासिक महत्त्व आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली आहे. गुरुवारी सकाळी प्रकाश आंबेडकर यांनीही चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.