मुंबई-अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या तपासावरुन मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चांगलेच सुनावले आहे. दाभोलकर हत्या प्रकरणात सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना सीबीआयने अटक केली आहे. मात्र या दोघांविरोधात सीबीआयने अद्याप आरोपपत्र दाखल केलेले नाही. त्यावरुन आज हायकोर्टाने सीबीआयला चांगलेच धारेवर धरले. या प्रकरणाचे गांभीर्य तुमच्या लक्षात येत नाही का, असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने सीबीआयच्या सक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला आहे.
दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना अटक केली आहे. मात्र हा तपास अतिशय संथगतीने सुरू असल्याचा आक्षेप घेत दोन्ही आरोपींच्या कुटुंबीयांना न्यायालयात याचिका दाखल केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाचे उदाहरण देत न्यायालयाने सीबीआयची खरडपट्टी काढली. ‘शेजारच्या कर्नाटकमधील तपास यंत्रणांनी गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण केला आहे. आता तिकडे खटलादेखील सुरू होईल. लंकेश यांची हत्या दाभोलकरांच्या हत्येनंतर जवळपास वर्षभरानंतर झाली. तरीही तुम्हाला अद्याप आरोपपत्र का दाखल करता येत नाही?’ असा सवाल न्यायालयाने विचारला.