औरंगाबाद : तरुणीची एकतर्फी प्रेमातून चाकूने भोसकून खून केल्याची घटना शहरात ताजी असतानाच वयोवृद्ध दाम्पत्याची घटना घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. भांडे व्यापारी शामसुंदर हिरालाल कलंत्री ( 55) आणि किरण शामसुंदर कलंत्री (45 ) अशी मृतांची नावे आहेत. दोघा दाम्पत्याचे पुंडलिक नगरात घरात कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळले आहेत. हत्येनंतर आरोपींनी घराला कुलूप लावत पळ काढल्याचा संशय आहे.
दुर्गंधी सुटताच घटना उघड
सोमवारी सकाळी कलंत्री यांच्या घराला कुलूप आहे आणि घरामधून दुर्गंधी येत असल्याची माहिती सविता सातपुते यांना पोलिसांना कळवली. पोलिसांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला असता पती-पत्नीचे मृतदेह वेगवेगळ्या मजल्यावर पलंगाखाली लपवून ठेवल्याचे यावेळी निदर्शनास आले. दरम्यान, मुलगा आकाश या घटनेपासून पसार असून त्याचा मोबाईल बंद येत आहे. याशिवाय मुलाने एसबी महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या बहिणीला शनिवारी धुळ्याच्या नातेवाईकांचा अपघात झाला आहे आम्ही तिकडे जात आहोत, तू मावशी सविताकडे जा, असे सांगितले. यानंतर मुलगी तिच्या काकाकडे गेली ही माहिती पुढे आली आहे. यामुळे पोलिसांचा तपास या दृष्टीने सुरू आहे. मात्र, शहरात लागोपाठ होणार्या हत्यांचे सत्र चिंताजनक ठरत आहे.
कुलूप पाहून मुलगी परतली
आई-वडिलांचा मोबाईल बंद लागत असल्यामुळे चिंतेने रविवारी दुपारी मुलगी घरी परतली होती मात्र दाराला कुलूप असल्याने सविता सातपुते या ओळखीच्या मानलेल्या मावशीच्या घरी राहिली. सोमवारी सकाळी ती पुन्हा घरी आली तेव्हा घरातून दुर्गंधी येत होती. यामुळे संविता यांनी पोलिसांना घटना कळविली, पोलिसांनी दार तोडून आत जाऊन पाहिले असता घटना उघडकीस आली.