दिंडी एक सामाजिक परिवर्तनाचा जागर – डॉ. संभाजी मलघे

0

प्लास्टिकमुक्त वारी हे यंदाच्या दिंडीचे वैशिष्ट्य

तळेगाव दाभाडेः पुरोगामी महाराष्ट्राला संत साहित्याची परंपरा लाभलेली आहे. त्यापैकी जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भिड संत कवी होते. भागवत धर्माचा कळस होण्याचे महद् भाग्य त्यांना लाभले. त्यांच्या अभंगांचे सामाजिक परिवर्तनाच्या कामात मोठे योगदान आहे. दिंडी हे सामाजिक परिवर्तनाच्या जागराचा एक भाग आहे आणि त्या दिंडीची सेवा करण्याची एक सुवर्णसंधी यानिमित्ताने विद्यार्थ्यांना मिळाली आहे, असे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे गुरुवारी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून लाखो वैष्णव देहूगावात येतात. यानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी कल्याण मंडळ विभागामार्फत इंद्रायणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देहू येथे ’स्वच्छ दिंडी,निर्मल दिंडी अभियान’ राबविले. यावेळी डॉ. मलघे बोलत होते. प्लास्टिकमुक्त वारी हे यंदाच्या दिंडीचे वैशिष्ट्य आहे.

प्लास्टिक न वापराचे आवाहन
या दरम्यान घाट परिसर, गाथा मंदिर परिसर प्लास्टिक आणि पत्रावळी मुक्त करुन नागरिक व भाविकांना प्लास्टिक बंदिचे आवाहन करण्यात आले. अभियानासाठी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष कृष्णराव भेगडे, कार्यवाह रामदास काकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, प्रा. गायधने आदींनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. देहु गावचे ग्रामविकास अधिकारी अर्जून गुडसुरकर, सोमनाथ मुसुडुगे, विठ्ठल काळोखे यांनी विद्यार्थ्यांना वारी व स्वच्छता याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वारकर्‍यांना निरोगी आरोग्याचे महत्व पटवून देत प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थींनी प्रतिनिधी स्नेहाली शेलार, कोमल काळे, पुजा आमनाजी, मोनिका पारखी, आश्‍विनी भालके तसेच विद्यार्थी प्रतिनिधी सौरभ कदम, भरत जाधव, आकाश सावंत, वैभव कदम, अनिकेत भोसले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन प्रा. संदिप भोसले, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सत्यम सानप, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी एस. एस. मेंगाळ, प्रा. दिप्ती पेठे यांनी केले.