दुष्काळाचे निकष बदलण्यासाठी केंद्राशी चर्चा

0

नागपूर । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. जळगाव जिल्हातील मुक्ताईनगर, बोदवड, अमळनेर या तालुक्यात तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र दुष्काळ जाहीर करण्याबाबत केंद्राचे निकष कडक झाले असल्याचे सांगत हे निकष बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून अधिवेशन संपल्यावर यासाठी दिल्लीला जाऊन चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

…तर लोकांनी मरायचं का?
खडसे यांनी या तीन तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती घोषित करण्याबाबत आक्रमक भूमिका घेत चांगलेच धारेवर धरले. यावेळी खडसे म्हणाले की, मी या मागणीसाठी पहिल्यांदा 4 जुलै रोजी पत्र दिले आहे. तरीही सरकार तक्रार मिळाली नाही, असे सांगत आहे. या तीन तालुक्यात 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी असल्याचे खडसे यांनी सांगितले. पाणीटंचाई असल्याने मी सप्टेंबरपासून मदत मागतोय, दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करा अशी विनंती केली, पण सरकारने काहीही केले नाही असे सांगत सरकार मदत करत नाही तर लोकांनी मरायचं का? असा खडा सवाल खडसे यांनी यावेळी केला. यावेळी खडसे म्हणाले की, केंद्र सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचे निकष बदलले आहेत, त्या निकषानुसार राज्यातील एकही दुष्काळी गाव बसणार नाही. केंद्र सरकारने तयार केलेले निकष बाजूला ठेवून दुष्काळग्रस्त तालुक्यांना मदत करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

निकष कडक असल्याची कबुली
यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, खडसे यांनी सांगितले ते बरोबर आहे, केंद्राचे निकष याबाबत अधिक कडक आहेत. पण यात एकही गाव बसणार नाही असे नाही, आम्ही गोंदिया जिल्ह्यातील 3 तालुके याच निकषावर दुष्काळ जाहीर केला आहे असे पाटील म्हणाले. हे निकष बदलावे यासाठी माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, याबाबत अधिवेशन संपल्यावर दिल्लीला जाऊ, असे पाटील यांनी यावेळी सांगितले. केंद्राच्या निकषानुसार दुष्काळ जाहीर केला नाही तर केंद्र सरकारची मदत मिळणार नाही असे सांगत ज्या गावांची आणेवारी कमी असेल त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेऊ असे चंद्रकांत पाटील यांनी
यावेळी सांगितले.