मुंबई-दूध तसेच अन्य अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी, यासाठी कायद्यात सुधारणा केली जाणार असून यंदाच्या अधिवेशनातच हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली. विधान परिषदेत दूध भेसळीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी आज उत्तर दिले.
दूध तसेच अन्य अन्नपदार्थात भेसळ केल्याप्रकरणी अजामीनपत्र गुन्हा दाखल करुन त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी, अशी सुधारणा केली जाणार असून यासंदर्भातील प्रस्ताव हिवाळी अधिवेशनातच मांडला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दूध तसेच अन्य अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी यासाठी कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती.
दुधात युरिया, ग्लुकोज, चरबी, कॉस्टिक सोडा तसेच गोडेतेलापासून पाण्यापर्यंत भेसळ करुन मोठ्या प्रमाणात विक्री होते. त्याचप्रमाणे अन्नधान्यातील भेसळीची प्रकरणे याआधी उघडकीस आली आहेत. भेसळ पदार्थामुळे लहान मुलांपासून मोठय़ांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. ‘इंडियन कौन्सिल फॉर मेडिकस रिसर्च’ (आयसीएमआर) या संस्थेने केलेल्या अभ्यासात दूध भेसळीमुळे क्षयरोग होत असल्याचे दिसून आले आहे.