राजपुतांना रायफल्सचे लेफ्टनन उमर फैयाज डिसेंबर 2016ला इंडियन मिलिटरी अॅकेडमीमधून पास होऊन सैन्यात दाखल झाले. तो एक उत्कृष्ट अधिकारी, अष्टपैलू खेळाडू होता व राजपूत जवानांमध्ये प्रिय होता. तो काश्मिरी होता. 9 मे रोजी सुट्टीवर नातेवाइकाच्या लग्नाला गेला असताना 5 दहशतवाद्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्या शरीराची गोळ्यांनी चाळणी करून सोपिअनला हर्मन चौकात फेकून दिले. त्याच दिवशी 3000 काश्मिरी लोक पोलीसमध्ये भरती होण्यासाठी लाइन लावून श्रीनगरला उभे होते. हे काश्मिरी सत्य आहे. एकीकडे दहशतवादी वाढत आहेत, तर दुसरीकडे त्यांचा प्रतिकार करणारे जास्त पटीने वाढत आहेत. सन 2003 पासून आम्ही शरणागती पत्करलेल्या व इतर 8000 काश्मिरी मुस्लीम युवकांना सैन्यात घेऊन 8 बटालियन उभ्या केल्या व काश्मीरच्या इतिहासात एक नवीनच विभाग बनवला. तत्कालीन प्रधानमंत्री वाजपेयी यांच्याकडून मी परवानगी मिळवली. या सैनिकांनी इतक्या निष्ठेने काम केले की, काश्मिरीमधील दहशतवाद मोडून काढला. काश्मिरी समाजात या सैनिकांचे स्थान मानाचे आहे. 20,000 रुपये पगार असणारी दुसरी कुठली नोकरी नाही. म्हणून त्यांच्याशी लग्न करायला काश्मिरी तरुणी अत्यंत उत्सुक असतात. सर्व गावांत दहशतवाद्यांना प्रवेश बंद करण्यात आला, असे असताना गेल्या दोन वर्षांत असे काय झाले की दहशतवाद नवीन जोमाने वाढू लागला?
सैन्य लोकांची मने जिंकते, दहशतवाद संपवते व आपले राजकीय लोक दहशतवाद निर्माण करतात हा आमचा अनुभव आहे. कारण राजकारण जाती धर्मावर चालवण्यात येते व सैन्य जाती धर्म बघत नाही. उमर आणि बाकी उदाहरण मी देशबांधव आणि भगिनी समोर का ठेवले? फक्त एकच बाब सिद्ध करायला की, दहशतवाद हा हिंदू-मुस्लीम खाक्यात कुणी बांधून ठेवू नये. कारण काश्मिरी आतंकी लोकांपेक्षा त्यांच्या विरुद्ध लढणारे काश्मिरी 100 पट जास्त आहेत. फक्त 4 जिल्ह्यांत दहशतवाद केंद्रित आहे, तर पूर्ण एलओसी भागात सीमेवर आदिवासी, बक्र्वाल, गुज्जर, राजपूत हे मुस्लीम असूनदेखील भारताबरोबर आहेत. फक्त श्रीमंत काश्मिरी लोक, जे श्रीनगर, अनंतनाग, सोपिअन भागात राहतात ते स्वतंत्र राष्ट्र मागत आहेत आणि याच भागात गेल्या 2 वर्षांत दहशतवाद पुन्हा जोमाने सुरू झाला. त्याला मोदी मेहबूबा सरकार पूर्णपणे जबाबदार आहे.
भारतीय सैन्य हे जगातील एकमेव सैन्यदल आहे ज्याने भारतामधील अनेक भागांत बंडोबाला थंडोबा केला. मग ते खलिस्तान असो का नागालँड, मिझोरम असो. कारण सैन्यात आम्हाला कडक आदेश होते की, बंदुकीच्या गोळीने दहशतवादाविरुद्ध लढता येत नाही. हृदय आणि मन जिंकून दहशतवाद संपवता येतो. म्हणूनच सैन्य जेव्हा हल्ला करते त्याच्यापाठी डॉक्टर असतो जो नागरिकांसाठी काम करतो. याला सद्भावना मिशन म्हणतात. बहुतेक काश्मिरी मुस्लीम दहशतवादाविरुद्ध आहेत. कारण लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मुहम्मद यांसारखे गट अहले हदीत किंवा वाहब्बी इस्लाम मानणारे आहेत. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 ला हल्ला करणारे कसाब व त्याचे साथी, सर्व अहले हदीत या गटांना मानत होते. इसिस असो का अल-कायदा असो हे सौदी अरेबियाचे वाहब्बी गट आहेत. 90% भारतीय मुस्लीम या पंथाना मानत नाहीत. यांच्या मशिदी, पोशाख, सर्व वेगळे आहेत. इसिसने वाहब्बी पंथाच्या नावे, 95% मुसलमानच मारले.
एकच कुराण, गीता, बायबल, बुद्धांचा धम्म असला तरी त्यात पंथ अनेक आहेत. धर्मांच्या ठेकेदारांनी आपलीच दुकाने उघडली. हिंदूंचा सर्वमान्य ग्रंथ नाही म्हणून अनेक रुढी परंपरा निर्माण झाल्या. पण जेथे धर्मग्रंथ आहेत तिथेदेखील अनेक पंथ असावे हे नवलच आहे. जसे ट्रिपल तलाकची प्रथा कुराणामध्ये तरी ग्राह्य नाही. पण समाजात सर्रास वापरली जाते. एकदा पैगंबराने एका माणसाला तलाक देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने मान्य केले नाही. मग पैगंबरानी परवानगी दिली, पण त्याला 100 चाबकाचे फटके मारण्याचा दंडदेखील दिला. कारण इस्लामिक कायदा त्याने मानला नाही. तलाकचा अधिकार पुरुषांना आहे, पण तलाक मुळात इस्लामला मान्य नाही. इस्लामप्रमाणे लग्न हे एक करार आहे.
तरी तलाक घ्यायचा असेल तर अनेक मुस्लीम पंथात आधी नवरा बायकोला वेगळे राहावे लागते. मग ज्येेष्ठ लोकांची मध्यस्थी करावी लागते. मग पहिला तलाक म्हटल्यानंतर दुसरा तलाक एका महिन्याने म्हणावा लागतो व तिसरा तलाक आणखी एका महिन्याने बोलावा लागतो. मगच घटस्फोट होतो. पण आपल्या समजुतीप्रमाणे एकाच वेळी तीनदा तलाक म्हटले तर तलाक होतो. हा समज चुकीचा आहे. प्रचलित समजुतीप्रमाणे पुरुषालाच घटस्फोट घेता येतो. पण हे चुकीचे आहे. मुलींनासुद्धा तलाक घेता येतो त्याला खुलाफ म्हणतात. पण ही बाब जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आली. इस्लाममध्ये एकंदरीत स्त्रियांना स्वातंत्र्य आहे. पण माणसांनी रुढी परंपरा बनवली व स्त्रियांना शोषणकारी व्यवस्थेमध्ये जखडून टाकले. धर्माचा आणि परंपरेचे खोटे हत्यार वापरून त्यांना पडद्याआड ढकलून दिले. हे सर्वच धर्मात प्रचलित आहे. जसे आजदेखील गावात हिंदू स्त्रिया पदरात राहतात. पर पुरुषासमोर बाहेर येत नाहीत. ख्रिचन धर्मात तर घटस्फोटाला परवानगीच नाही म्हणतात की लग्न स्वर्गात ठरतात आणि पृथ्वीवर साजरी केली जातात. पण समान नागरी कायद्यात घटस्फोट घेता येतो.
धर्माचे ठेकेदार, पुजारी, मौलाना, पाद्री यांनी आपले महत्त्व कायम ठेवण्यासाठी रुढी व परंपरेत मानवाला जखडून टाकले. कुराणाने कुणाही माणसाला धर्माचा अर्थ लावण्याचा अधिकार दिला नाही. प्रत्येक व्यक्तीने स्वत: कुराण वाचावे अशी अपेक्षा आहे. पण हे शक्य नाही कारण कुराण अरबी भाषेत आहे. फार कमी लोकांना अरबी येते. म्हणून मौलाना/मौलवी कुराण वाचून दाखवतात. बर्याचदा स्वत:चेच समज घुसवतात. म्हणूनच शाहू महाराजांनी कुरणाचे मराठी भाषांतर केले. अशा अज्ञानामुळे वेगवेगळ्या लोकांनी धर्म ग्रंथांचा वेगवेगळा अर्थ लावल्यामुळे वेगवेगळे पंथ निर्माण झाले. परिणामत: एकाच धर्माचे लोक एकमेकाचे रक्त पिण्यास अग्रेसर बनले.
घटना कलम 25 प्रमाणे प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करायला परवानगी आहे, याचा अर्थ असा होत नाही की रुढी-परंपरा, अंधःश्रद्धा पाळायला परवानगी आहे. आता खरा धर्म काय आहे, हे कोण ठरवणार. हा अधिकारच कुणालाही नाही. धर्माचा अर्थ पुजारी, मुल्ला, पादरी ठरवतात. पण हा अधिकार यांना कोणी दिला? धर्मग्रंथात हा अधिकार कुणालाच दिला नाही. म्हणूनच सर्वच धर्मांत अनेक पंथ आहेत. बुवा आहेत. सत्ताधार्यांनी आपल्या मर्जीतल्या पुजार्यांना/मौलाना धर्माचे ठेकेदार बनवले व आपल्याला सोयीचे असेल ते धार्मिक कायदे बनवले. शिया-सुन्नी हे मुस्लिमांमधीलच पंथ, आज एकमेकांच्या विरुद्ध युद्ध करत आहेत. सुन्नी पंथामध्येच तालिबान आणि इसिसमध्ये यादवी चालू आहे. कारण स्पष्ट आहे. आपले दुकान चालवण्यासाठी सत्तेच्या खेळात धार्मिक दुकाने बनवली. पुजार्यांनी राजाची चमचेगिरी केली आणि धर्माचा उपयोग त्यांना सोयीची असलेली न्यायव्यवस्था बनवण्यात आली. आता सर्वोच न्यायालयात ट्रिपल तलाकवर सुनावणी चालू आहे. त्यात मुस्लीम पर्सनल कायदे मंडळाने मुसलमानांची बाजू मांडली आहे. त्यांना हा अधिकार कोणी दिला. कुराणामध्ये तर त्यांना हा अधिकार नाही दिला. मग हे लोक इस्लामवर कसे भाष्य करू शकतात तसेच हिंदूंचे प्रतिनिधी भारतात कोण आहेत? मी तरी माझी बाजू मांडायला कुणालाच अधिकार दिला नाही, तरी काही उपटसुंभ हिंदुत्व म्हणून उड्या मारत आहेत. त्यामुळेच समाजात गोंधळ माजला आहे व धार्मिक द्वेष पसरला आहे. बेजबाबदार लोक धर्माचे ठेकेदार झाले व आपली तुंबडी भरत आहेत. जसे बहुसंख्य मराठी वा काश्मिरी मुसलमान, कट्टरपंथी विकृत धार्मिक प्रवृती विरुद्ध कट्टरपणे उभा आहे. त्याचे दोन्हीकडून मरण आहे. दहशतवादी त्याला शत्रू मानतात व हिंदूही त्यांना आपला शत्रू मानतात. त्यात काश्मिरी आणि मराठी मुसलमान भरडला जात आहे. कट्टरपंथी लोकांना विरोध करत असताना उमर फैयाजसारख्या देशभक्तांना दूर लोटू नका. हाच संदेश उमरचा आहे. कारण शक्तिशाली भारत बनवायचा असेल तर धर्म आणि जातींच्या नावे देशभक्ती ठरवणे बंद झाले पाहिजे व देशांच्या शत्रूंना टिपून नेस्तनाबूत केले पाहिजे, पण पाकिस्तानचा कायमचा निकाल लावल्याशिवाय हा रक्तपात थांबणार नाही हे सर्वश्रुत आहे.
– ब्रि. सुधीर सावंत
9987714929