सुरक्षित रक्त पुरवठयासाठी रक्तदान करण्याची प्रत्येकाची नैतिक जबाबदारी- खासदार साबळे
पांजरपोळ येथील अंधशाळेस निधी स्वरूपात मदत
चिंचवडः कुणाला कधी आणि कुठे रक्ताची गरज पडेल हे सांगता येत नाही. आपण आजही कृत्रिम रक्ताची निर्मिती करु शकलेलो नाही हे सत्य आहे. त्यासाठी ऐच्छिक रक्तदान आवश्यक आहे. सुरक्षित रक्त पुरवठयासाठी ऐच्छिक रक्तदानाची नैतिक जबाबदारी समजून प्रत्येकाने रक्तदान करावे, असे मत खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केले. भाजपचे नगरसेवक, स्थायी समितीचे सदस्य तथा वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य विलास मडिगेरी यांचा वाढदिवसानिमित्त भोसरीतील इंद्रायणी नगर, वैष्णोमाता प्रांगण येथे आयोजित कार्यक्रमात खासदार साबळे बोलत होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव व भिमराव शिंगाडे आणि निरीक्षक अजय भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक विलास मडिगेरी गेली 12 वर्षे असे सामाजिक उपक्रम राबवित असून स्वत: नगरसेवक मडिगेरी यांनी 61 वेळा रक्तदान केले आहे. महापौर नितीन काळजे, सभागृह नेते एकनाथ पवार, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, नगरसेवक संतोष लोंढे, नामदेव ढाके, संदीप कस्पटे, उद्योजक महेश चांदगुडे, अमित गोरखे, शशिकांत कदम, बाबासाहेब त्रिभुवन, मोरेश्वर शेडगे, नानासाहेब राऊत उपस्थित होते
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान
खासदार अमर साबळे पुढे म्हणाले की, ज्या समाजात आपण राहतो त्याच ऋण फेडायची एक संधी रक्तदान आपल्याला मिळवुन देते. कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही. तुमच्यामुळे कोणाचा तरी जीव वाचण्यास मदत होते आहे, म्हणून रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. एकनाथ पवार म्हणाले की, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात. जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. कष्टाची तयारी असली आणि योग्य मार्गदर्शन मिळाले, तर हमखास विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करू शकतात.
शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल संचालित विश्वेश्वर ब्लडबँक व महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालय यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात 200 जणांनी सहभाग घेतला. दरम्यान यावेळी उद्योजक व्यंकटराव शिंदे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. महापालिकेच्या उद्यान विभागाचे मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंके यांच्या उपस्थितीत 172 वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच पांजरपोळ येथील अंध शाळेत निधी स्वरूपात मदत करण्यात आली. शांतीनगर आश्रम शाळेस अन्नदान, चिंचवड चापेकर स्मारक समितीच्या गुरुकुलम या शाळेत अन्नदान आणि दहावी, बारावीतील 60 टक्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या 340 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान आणि श्री साई चौक मित्रमंडळाच्यावतीने या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते.