नरभक्षक बिबट्याचा सहावा बळी; वरखेडे खुर्दला वृद्धेचा फडशा

0

चाळीसगाव । प्रतिनिधी । तब्बल एक नव्हे दोन नव्हे तर पाच जणांचा लागोपाठ बळी घेणार्‍या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश सोमवारी राज्याच्या वनमंत्र्यांनी देऊन काही तासांचा अवधी होत नाही तोच तालुक्यातील वरखेडे खुर्द येथे झोपडीत झोपलेल्या वृद्धेवर बिबट्याने हल्ला चढवल्याने वृद्धेचा बळी गेल्याने बिबट्याच्या हल्ल्यातील मयतांची संख्या आता सहावर पोहोचली आहे. यमुनाबाई तिरमली (७०) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या वृद्धेचे नाव आहे. मंगळवारी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली तर वनविभागाला पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

वस्तीत शिरून वृद्धेचा पाडला फडशा

आतापर्यंत शेत-शिवारात जनावरांचा नागरीकांवर हल्ला चढवणार्या नरभक्षक बिबट्याने चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे खुर्द गावातील झोपडीवजा घरात राहणार्या यमुनाबाई दला तिरमली (७०) या कुटुंबातील तिघा मुलांसह झोपल्या असतानाच नरभक्षक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. घटनास्थळापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर तिरमली यांची मान आढळली तर धडाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. तिघा मुलांसह गाढ झोपेत असलेल्या यमुनाबाई यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवत त्यांना ओढून जंगलाकडे नेत असताना ओरडण्याचा तसेच सर्र-सर्र आवाज झाल्याने कुटुंबातील सदस्य जागे झाले मात्र तो पर्यंत उशीर झाला होता.

डोके सापडले, धडाचा शोध सुरू
वरखेडे खुर्द गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावरच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी बिबट्याचा शोध घेत असताना ही घटना घडल्यानंतर पहाटे चार वाजेच्या सुमारास सुमारे २० कर्मचारी दाखल झाले. तिरमली यांचे डोके सापडले असलेतरी धडाचा मात्र पत्ता न लागल्याने रात्रीच्या अंधारात बॅटरीच्या प्रकाशात त्यांच्या धडाचा शोध घेतला जात होता.

सुस्त वनविभाग अन् निष्पापांचे जाताय बळी

नरभक्षक बिबट्याच्या उच्छादाने मंगळवारच्या घटनेसह पाच महिन्यात तब्बल सहा जणांचे बळी गेले आहेत. अत्याधूनिक ड्रोन कॅमेरे, ट्रॅन्क्यूलायझर गन व शॉर्प शुटरसह ३५ जणांची टीम बिबट्याला पकडण्यात अपयशी ठरल्याने ग्रामस्थांमध्ये वनविभागाच्या कार्यपद्धत्तीविषयी तीव्र रोष उफाळला आहे. ८ जुलैच्या हल्ल्यात राहुल चव्हाण (वय ८), ११ सप्टेंबरच्या हल्ल्यात अलका अहिरे (५०), ११ नोव्हेंबरच्या हल्ल्यात बाळू सोनवणे (२५), १५ नोव्हेंबरच्या हल्ल्यात दीपाली नारायण जगताप (२५, वरखेडे) तर एक दिवसांपूर्वीच २७ नोव्हेंबर रोजी सुसाबाई धना नाईक (भील, ५५) यांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेल्याची घटना विस्मरणात जात नाही तोच ही दुर्दैवी घटना घडल्याने नागरीक संतप्त झाले आहेत.

जनतेत रोष

सोमवारी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हातात बंदूक घेत बिबट्याच्या शोध मोहिमेत सहभाग नोंदवला होता. बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत जिल्हा सोडणार नसल्याचे सुतोवाच त्यांनी केले होते तर मंगळवारी पहाटे सहावा बळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये आणखीन रोष उफाळला आहे. २७ रोजी बळी ठरलेल्या सुसाबाई भील यांचा मृतदेह नातेवाईकांनी चाळीसगाव पोलीस ठाण्याबाहेर आणून बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मागितल्यानंतर आमदार उन्मेश पाटील यांनी राज्याचे प्रधान सचिव विकास खर्गे यांच्याशी संपर्क केला होता तर वनमंत्र्यांनी बिबट्याला ठार मारण्याचे आदेश देऊन काही तास होत नाही तोच वृद्धेचा बळी गेल्याने ग्रामस्थांच्या संयमाचा बांध सुटला आहे. निष्पापाचे नाहक प्राण जात असल्याने किमान आतातरी प्रशासन व वनविभागाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.