नवापूर:तालुक्यातील दुकानदार किंमतीपेक्षा दुप्पट किंमतीने माल विकून लूट सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाने सर्व दुकानदारांची चौकशी करुन त्यांचे परवाने रद्द करावे. नागरिकांवर अन्याय होऊ नये याची दखल घेण्याचे निवेदनात म्हटले आहे. अशा आशयाचे निवेदन पंचायत समिती सदस्य यशोदा वळवी, भांगरपाडा गावाचे सरपंच जयंत पाडवी, माजी पं.स.सदस्य जालमसिंग गावित यांनी तहसीलदार उल्हास देवरे आणि पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना नुकतेच दिले.
निवेदनात म्हटले आहे, नवापूर तालुक्यातील दुकानदार किंमतीपेक्षा दुप्पट किमतीत माल विकणे, सिंमेट पत्रे, लोखंड, पाईप, वायर आणि जिवनावश्यक सर्व वस्तू तसेच शेतकर्यांकडून दुकानदार मनमानी भावाने माल घेऊन आणि त्यांच्याकडून कोणताही माल घेतला की दुप्पट किंमतीने माल देणे म्हणून प्रशासनाने या दुकानदारांविषयी गांभिर्याने घेतली पाहिजे. या दुकानदारांची चौकशी करुन त्यांचे परवाने त्वरित रद्द करावे. कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव असल्यामुळे संपुर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे आर्थिक परिस्थिती खालावली आहे.
कोणत्याही वस्तूचे जास्त भाव अवाजवी लावु नये, अशा केंद्र शासनाच्या सूचना आहे. मात्र, दुकानदार मालाला दुप्पट किंमत लावत आहे. म्हणून जिवनावश्यक वस्तू व घर बांधण्यासाठी लागणार्या सर्व वस्तूंवर जास्त भाव लावु नये आणि शेतकर्यांच्या मालाला भाव द्यावा, असेही निवेदनात नमूद आहे. निवेदनावर पं.स.सदस्य भरडु यशोदा वळवी, भांगरपाडा सरपंच जयंत पाडवी, माजी पं.स.सदस्य जालमसिंग गावित, दिलीप गावित, पोसल्या गावित, काशिराम गावित, जयराम गावित यांच्या स्वाक्षर्या आहेत.