नवापूर: कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पाश्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अनेक कार्यक्रमांना मर्यादा आल्या आहेत. यात नवापूर शहरालगत २ किमी अंतरावर कोरोना रुग्ण आढळल्याने संपुर्ण रेल्वे स्टेशन, वाकीपाडा हा पुर्ण भाग ३ दिवस संपुर्ण बंद करण्यात आला आहे.
माणसांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे असलेले विवाह बंधन हे आता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत व सोशल डिस्टनसिंग पाळूनच लावले जात आहे.
नवापूर नगरपालिकेचे सेवानिवृत आरोग्य कर्मचारी विजय गोपाळ पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव रणजीत व नंदुरबार तालुक्यातील टोकर तलाव येथील शेतकरी राजेंद्र मोहनसिंग राजपूत यांची मुलगी भावना यांचा शुभ मंगल विवाह सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत व सोशल डिस्टनसिंग पाळून व शासनाचे नियम लक्षात घेऊन नवापूर शहरातील सराफ गल्ली येथे घराच्या दुसऱ्या मजल्यावर लावण्यात आला. लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यापासुन संपूर्ण जिल्हाभरामधील परिसरातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत.जीवनावश्यक वस्तू मेडीकल, दवाखाने,भाजीपाला आदी सुरु होते.पंरतु आता नंदुरबार जिल्हामध्ये शिथिलता देण्यात आली आहे.तरीसुध्दा पूर्वनियोजीत सामाजिक कार्यक्रम लग्न समारंभही पुढे ढकलण्यात आले होते. मात्र, काही लग्न समारंभ प्रशासनाच्या अटी शर्ती राखत करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मोजक्या २५ ते ३० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला.
नियम पाळून साध्या पध्दतीने आदर्श विवाह
समाजापुढे आदर्श निर्माण करीत इच्छा शक्ती व परिस्थिती असून सुद्धा कोरोना संकटामुळे अतिशय मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत सरकारी नियमाचे पालन करीत उपस्थित सर्वाना सॅनिटायझर ठेवुन सर्वानी मास्क लावले होते. बँड,घोडा, आहेर, वऱ्हाडी गाड्या या सर्व पारंपरिक पध्दतींना बगल दिली. वराचे पिता विजय पाटील व वधुचे पिता राजेंद्र राजपूत यांची लग्न फार थाटात व्हावे, अशी सर्वाची इच्छा होती. पण परिस्थितीनुसार शासनाचे सर्व नियम पाळून साध्या पध्दतीने सरकारी नियमात बसवून एक आदर्श विवाहाचे समाजापुढे उत्तम उदाहरण निर्माण केले आहे.