निमंत्रणपत्रिकेतून महापौरांचे नाव गायब!

0

पुणे । भाजपने छापलेल्या पुणे भाजप वर्धापनदिन स्नेह मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेतून भाजपच्या महापौरांचे नावच गायब आहे. अनेक वर्षांनंतर भाजपला पुण्यात घवघवीत यश मिळाले, मात्र आपल्याच पक्षाच्या महापौरांना शहर भाजपच्या निमंत्रण पत्रिकेत स्थान नाही. शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना विविध सामाजिक राजकीय संघटनात्मक कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकांमध्ये मानाचे स्थान असते. मात्र भाजप संघटना त्याला अपवाद ठरली आहे आणि खुद्द आपल्याच पक्षाच्या महत्वाच्या कार्यक्रमात आपल्याच पक्षाच्या महापौराचे नाव निमंत्रणपत्रिकेतून वगळण्यात आले आहे. यामुळे शहर भाजपमधील गटबाजी वाढल्याचे दिसून येत आहे.

शिरोळे, काकडे, कांबळेंचेही नाव नाही
भारतीय जनता पार्टीचा 38 वा वर्धापनदिन 6 एप्रिलला मुंबईत राज्यस्तरावर व 8 एप्रिलला पुण्यात स्थानिक स्तरावर साजरा होत आहे. मात्र, पुण्यातील वर्धापन दिनाच्या निमंत्रणपत्रिकेतून महापौर मुक्ता टिळक यांचे नावच वगळण्यात आले आहे. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, सहयोगी खासदार संजय काकडे तसेच शहरातील आमदारांचीही नावे या पत्रिकेत नाहीत. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत भाजपाचेच आमदार आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट तसेच पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांचीच नावे या पत्रिकेत आहेत.

हे पक्षाच्या नियमाला धरून
यासंदर्भात महापौर मुक्ता टिळक यांनी खुपच सावध प्रतिक्रिया दिली आहे. महापौरांनी म्हंटले की, आता हे नाव का टाकण्यात आले नाही, यावर जास्त भाष्य न करता, नाव न टाकणे योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. भाजपात पक्षापेक्षा व्यक्ती श्रेष्ठ नाही, त्यामुळे नाव असणे महत्वाच नाही. पक्षात यावरून काही वाद नाही, अशी सारवासारव महापौरांनी केली आहे. तर शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी म्हंटले आहे की, पक्षाचे काही शिष्टाचार आहेत, ते माहिती नसलेल्यांकडून ही टीका होत आहे. हा पक्षसंघटनेचा कार्यक्रम आहे. महापौर हे पुण्याचे प्रथम नागरिक आहेत. त्यांचे नाव पक्षसंघटनेच्या कार्यक्रमात येणे योग्य नाही. केंद्रीय मंत्री, पालकमंत्री व शहराध्यक्ष यांची नावे असणे पक्षाच्या नियमाला धरून आहे.

नियोजन बैठकीतील वाद वाढला?
मुंबईतील कार्यक्रमानंतर पुण्यात 8 एप्रिलला कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. रमणबाग येथे सायंकाळी 6 ते 8 या वेळात हा मेळावा होईल. त्या वेळी केंद्र व राज्य सरकार तसेच महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांची माहिती देणार्‍या फलकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.
याच कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत महापौर तसेच महापालिकेच्या अन्य पदाधिकार्‍यांची नावे वगळण्यात आली आहे. महापौर हे पुण्याचे प्रथम नागरिक असल्याने त्यांचे नाव टाकायला हवे होते, असे काही कार्यकर्त्यांचे मत आहे. 6 एप्रिलला पक्षाचा वर्धापनदिन आहे. तो मुंबईत साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त तिथे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. पुण्यातून किती कार्यकर्ते जाणार, कोण नेणार याचे नियोजन करण्यासाठी झालेल्या बैठकीत आमदार व नगरसेवक यांच्यात जबाबदारी घेण्यावरून काही शाब्दिक वाद झाले होते. तसेच पक्षाच्या 101 नगरसेवकांपैकी तब्बल 30 नगरसेवक व खासदार काकडे या बैठकीला अनुुपस्थित होते. त्यावरून पक्षात अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा आहे.