नियोजनशून्य कारभारानेच राज्यसरकारची अब्रू गेली- धनंजय मुंडे

0

नागपूर – सरकारची लहरी वृत्ती, नियोजनशून्य कारभारामुळे आज नागपुर अधिवेशनात पाण्याची परिस्थिती उद्भवली त्यामुळे राज्य सरकारची अब्रू गेली आहे अशा शब्दात विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या कारभाराची लक्तरे काढली. नागपुर अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी कामकाज सुरू होण्यापुर्वीच लाईट गेल्यामुळे निर्माण झालेला गोंधळ आणि त्यामुळे कामकाज दिवसभर तहकुब करण्याची नामुष्की सरकारवर आली. विधीमंडळाच्या इतिहासामध्ये लाईट गेल्यावर कामकाज बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्याच्या कुठल्याही ग्रामपंचायतीची सभा,बैठकही अशाप्रकारे बंद होत नाही. ती वेळ सर्वोच्च सभागृहावर यावी ही सरकारसाठी लाजीरवाणी बाब असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

अधिवेशनाची कोणतीही तयारी नसताना केवळ दिखावा करण्यासाठी नागपुरला अधिवेशन घेण्याचा सरकारचा राज आणि बालहट्ट होता तो या निमित्ताने दिसुन आला आहे. राज्यात जलयुक्त शिवार अयशस्वी झाले असले तरी देवेंद्र फडणवीस सरकारने नागपुरात अधिवेशन घेवून जलयुक्त नागपूर राज्याला दाखवुन दिले असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला. याप्रकरणी सरकारने जाहीर माफी मागावी अशी मागणी करतानाच विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिकेचे अधिकारी या परिस्थितीला जबाबदार असल्याने अधिक्षक अभियंत्यापासुन कार्यकारी अभियंता आणि सर्व दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी यावेळी केली.

भाजपाच्या ताब्यातील नागपुर महानगरपालिका असो की शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महानगरपालिका असो ही दोन्ही महानगरे कुठल्याही संकटात सुरक्षित ठेवण्यात आणि किमान सार्वजनिक सुविधा पुरविण्यात अपयशी असल्याचे सांगत दोन्ही पक्षांवर धनंजय मुंडे यांनी निशाणा साधला. सरकारकडे फॉल बॅक प्लॅन का नव्हता? असा सवाल उपस्थित करताना सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी आज हुकल्याबद्दल वाईट वाटते असेही धनंजय मुंडे म्हणाले.

बंगल्यात पाणीच पाणी आणि अंधारात कारभार
दरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे नागपूरच्या रवी भवनातील 22 नंबरच्या कुटीरमधील निवासस्थानी असून त्यांच्या निवासस्थानी पाणीच पाणी झाल्याने मुंडे यांच्यासह तेथील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.