राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेशी कोणतीही चर्चा न करता नोटाबंदीचा निर्णय घेत मोदींनी असंघटित कामगार क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त केले. नोटाबंदीमुळे मध्यम आणि लघु उद्योजकांना मोठा फटका बसला. बेरोजगारीमुळे लोकांच्या मनात मोठा राग असताना मोदींनी धार्मिक द्वेषाचे राजकारण सुरु केले. लोकांच्या मनातील रागाचा मोदींनी वापर केला. द्वेषाचे राजकारण मोदींना सत्तेत आणू शकते. मात्र त्यामुळे देशातील बेरोजगारीची समस्या सुटणार नाही, असे मत फायनान्शियल टाईम्सच्या लेखात काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त केंद्र सरकारकडून काळा पैसाविरोधी दिन साजरा केला जात असल्याने त्यावर टीका करणारा हा लेख आहे.
15 लाख लोकांनी रोजगार गमावला
लेखात म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत होती. मात्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाने भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्वास पुसून टाकला आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सकल राष्ट्रीय उत्पादनात 2 टक्क्यांची घट झाली. यामुळे असंघटित क्षेत्राचे कंबरडे मोडले. मध्यम आणि लहान व्यावसायिक उद्ध्वस्त झाले. नोटाबंदीमुळे लाखो कष्टकरी भारतीय देशोधडीला लागले. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार नोटाबंदीनंतरच्या चार महिन्यांमध्ये 15 लाख लोकांना रोजगार गमवावा लागला. कोणत्याही पूर्वतयारीशिवाय लोकांवर लादण्यात आलेल्या नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेला दुहेरी फटका बसला आहे. नोटाबंदीमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे नवीन लायसन्स राज सुरु झाले असून, सरकारी अधिकार्यांना प्रचंड अधिकार देण्यात आले आहेत. भारत हा चीनप्रमाणेच उत्पादन क्षेत्रातील बलाढ्य देश होऊ शकतो. मात्र या मार्गात काही आव्हाने आहेत. लहान आणि मोठ्या उद्योजकांना, व्यावसायिकांना तंत्रज्ञानाशी जोडण्याची आवश्यकता आहे. त्यांचे जाळे अधिक सक्षम करण्याची गरज आहे. मात्र मोदी सरकारने नोटाबंदी आणि जीएसटीमुळे त्यांची अवस्था बिकट केली आहे, असे राहुल गांधी यांनी या लेखात नमूद केले आहे.
खरे लाभार्थी शहा पिता-पुत्र : लालूप्रसाद यादव
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनीही भाजपवर टीकास्त्र डागले. नोटाबंदीच्या माध्यमातून अनेक श्रीमंत लोकांचा काळा पैसा पांढरा झाला. तर गरिबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अमित शहा यांच्या संपत्तीत 300 पटींनी तर त्यांच्या मुलाच्या संपत्तीत 16000 पटींनी वाढ झाली. हेच नोटाबंदीचे सर्वोच्च यश म्हणायला हवे, अशी खोचक टीका लालूप्रसाद यांनी केली. एका व्यक्तीचा अहंकार शमविण्यासाठी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये 150 लोकांचा बळी गेला. आम्ही भाजपचा विरोध करतो म्हणून आमच्यावर सीबीआयकडून छापे मारण्यात आले. मात्र, यामध्ये काळा पैसा मिळाला का, याचे उत्तर त्यांनी द्यावे. सरकारने घेतलेला जीएसटीचा निर्णयही अयोग्य आहे. जगात ज्या ठिकाणी जीएसटी व्यवस्था अंमलात आणली गेली, तेथे ती कायमच अपयशी ठरली. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशात भाजपविरोधी वातावरण निर्माण झाले आहे, असे लालू प्रसाद यादव म्हणाले.