पडळकरांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल: जितेंद्र आव्हाड

0

मुंबई:- “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहे” असे वादग्रस्त विधान भाजपाचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. या वादग्रस्त विधानाचा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निषेध व्यक्त केला आहे. तसेच गंभीर परिणामांना सामोरं जावे लागेल असा इशाराही दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखं आहे. केवळ प्रसिद्धीच्या वर्तुळात राहण्याचा हा असहाय्य प्रयत्न आहे. शरद पवारांबद्दल बोलण्याची लायकी आहे का त्यांची. जो माणूस कालपर्यंत मोदींना शिव्या देत होता, त्यांच्याकडूनच उमेदवारी घेतो. भाजपात जाऊन बहुजनांच्या गोष्टी आम्हाला शिकवताय. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला शरद पवारांनी इथपर्यंत आणलं आहे,” असं जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितलं.

“असे अनेक गोपीचंद महाराष्ट्रात झाले आहेत. पवारांच्या उंचीलाही ते स्पर्श करु शकत नाहीत. शरद पवारांवर बोलताना जी भाषा वापरली आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो. त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल,” असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.