परकीय संस्कृती आणि शब्दांचा स्वीकार हे सांस्कृतिक आक्रमणच

0

मुंबई । समाजमाध्यमातून मराठीतून साधला जाणारा संवाद, स्फुट लेखन यांना प्रोत्साहित करण्याबरोबरच त्या व एकंदरीत साहित्य आणि भाषा विश्‍वातील इतर भाषांचे आक्रमण रोखले पाहिजे. इतरांच्या शब्दांबरोबरच त्या परकीय संस्कृतीचे सांस्कृतिक आक्रमणदेखील आपल्यावर होत असते, ही गुलामगिरीदेखील रोखली पाहिजे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिका विनया खडपेकर यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या विलेपार्ले शाखेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने एक दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात करण्यात आले.

संमेलनास साहित्य रसिकांनी उपस्थिती विशेष होती. संमेलनप्रमुख माधवी कुंटे, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू, भरारी प्रकाशनच्या लता गुठे व विश्‍वघर संस्थेच्या रेखा नार्वेकर यांच्या सहकार्याने झालेल्या या संमेलनात स्वागताध्यक्ष डॉ. पुष्पा रमेश प्रभू, सुप्रसिद्ध साहित्यिक सुमेध रिसबूड व ज्येष्ठ साहित्यिका स्मिता भागवत (कॅनडा) यादेखील उपस्थित होत्या. ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर, रजनी वेलणकर, अभिनेत्री चिन्मयी सुमीत, मंजिरी वैद्य, परशुराम खवले, प्रा. छाया पिंगे, ज्ञानेश चांदेकर यांनी संमेलनात सहभाग घेतला.

मराठी लोप पावणार नाही
मराठी भाषेला देवनागरी म्हणतात व ती देवांनी निर्माण केल्यामुळे कधीच लोप पावणार नाही, अशी आशा उद्घाटक व उद्योजक प्रसाद पाटील यांनी व्यक्त केली. नव्या पिढीला मराठी साहित्याशी जोडण्यासाठी विविध घटकांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे विचार अरविंद प्रभू यांनी मांडले. सध्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असली तरी ते वाचले गेले पाहिजे, असे ते म्हणाले.

अनुवादित साहित्याचे प्रमाण वाढले पाहिजे व त्याचबरोबर त्यात केवळ अनुवाद नको तर भावानुवाद असला पाहिजे व अशा साहित्याच्या निर्मितीवर भर दिला गेला पाहिजे.
-स्मिता भागवत, मराठी साहित्यिका.