रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक वाया जाण्याची शक्यता
पुरंदर : पुरंदर तालुक्यात परतीच्या पावसाने हुलकावणी दिली आहे. रब्बी हंगामातील ज्वारीचे पिक वाया जाऊ नये म्हणून जमिनीत पुरेशी ओल नसतानाही पुरंदर तालुक्यातील शेतकर्यांनी ज्वारीची पेरणी सुरू केली आहे. परंतु परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पावसाअभावी पेरणी केलेल्या ज्वारीची उगवण व्यवस्थित होणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
खरीप हंगामही गेला वाया
पुरंदर तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील कामे सुरु आहेत. यात सर्वाधिक क्षेत्रावर ज्वारीची पेरणी केली जाते. कृषी विभागही या हंगामात ठराविक शेतकर्यांच्या शेतात ज्वारीची पेरणी करुन ज्वारीचे बी तयार करतात. तसेच ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कसे वाढवता येईल याकडे बारकाईने लक्ष देतात. तसे पाहिले तर श्रावण महिना संपला की ज्वारीच्या पेरणीची लगबग सुरू होते. मात्र, यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगाम पुर्णत: वाया गेला आहे. यामुळे बाजरीच्या पिकाला पुरंदर तालुका मुकला आहे.
पाण्याची टंचाई
खरिप हंगाम जरी वाया गेला असला तरी याची भर यंदाचा रब्बी हंगाम भरून काढेल अशी अपेक्षा होती. मात्र, खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही पावसाने हुलकावणी दिली. एकही जोरदार पाऊस झाला नाही. यामुळे सध्या जमिनीत पुरेशी ओल नाही. पाऊस पडेल या आशेवरती शेतकरी कोरडीलाच पेरणी करीत आहेत. मुसळधार पावसाची सर्वच नक्षत्रे कोरडी गेली आहेत. सध्या पाऊस परतीच्या प्रवासाला निघाला आहे. तो किती प्रमाणात होईल याची शाश्वती नाही. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी येते. शेतकरी पैसे भरून पाणी घेतात. गावाजवळील ओढे, नाले भरून घेतात. यामुळे गावाजवळील विहिरी व बोअरवेल यांना पाणी येते. परंतु पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी हे पुण्याचे सांडपाणी आहे. ते स्वच्छ नाही. परंतु दुसरा कोणताही पर्याय नसल्याने नाईलाजाने हे पाणी प्यावे लागते. यामुळे या भागात पिण्याचे पाणी कसेबसे मिळते. मात्र, सध्या पुरंदर तालुक्यात अनेक भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या वर्षात एकही जोरदार पाऊस झाला नाही. यामुळे विहीरींची पाण्याची पातळी खोलवर गेली आहे.
पिके जळू लागली
शेवंती, झेंडू, कापरी आदी फुलांची पिके पावसाची वाट पाहत तग धरून उभी आहेत. त्याचप्रमाणे कांदा पिकांच्या लागवडी सुरू करण्यात आल्या आहेत. काही शेतकर्यांनी पाऊस पडेल या आशेवरती कोरडीलाच कांदा लागवड केली होती. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने लागण केलेली पिके पाण्याअभावी जळून गेली आहेत. तालुक्यात दरवर्षीच पाऊस कमी पडतो. पावसाच्या आशेवरती ज्वारीची पेरणी सुरू आहे. पाऊस न झाल्यास ज्वारीच्या पिकावर मोठा परिणाम होऊन उत्पन्न घटणार आहे, असे येथील एका शेतकर्याने सांगितले.