पराभव टाळण्यासाठी सरकारकडून घोषणेचा पाऊस-राधाकृष्ण विखे पाटील

0

मुंबई- आगामी निवडणुकीत पराभव टाळण्यासाठी मोदी सरकारने निरर्थक अर्थसंकल्प मांडला असून, हा भाजपाचा जुमलेबाज जाहीरनामाच असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मागील ५ वर्षात या सरकारला काहीही करता आले नाही. या सरकारने यापूर्वी ५ पूर्ण अर्थसंकल्प मांडले. पण त्यातील घोषणा प्रत्यक्षात उतरल्या नाहीत. त्यामुळे लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. आगामी निवडणुकीतील आपला पराभव टाळण्यासाठी केलेली शेवटची धडपड आहे अशी टीका देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

या अर्थसंकल्पात सरकारने दावा केला की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले. पण ही वस्तुस्थिती नाही. आपले हे अपयश झाकण्यासाठीच सरकारने दोन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रूपये अनुदान देण्याची घोषणा केली. वर्षाला ६ हजार रूपये म्हणजे महिन्याला ५०० रूपये होतात. यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असते तर शेतकऱ्यांना अधिक लाभ झाला असता. या सरकारने यापूर्वीही शेतकऱ्यांना अनेकदा मदत करण्याच्या घोषणा केल्या आहेत. पण जुन्या घोषणांचे पैसे अद्याप मिळालेले नसताना आणखी एका घोषणेवर कसा विश्वास ठेवायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.