परीक्षा रद्दचा राज्याभरातील विद्यार्थ्यांना नाहक त्रास

0

पुणे –‘मी परभणीहून रात्रीच्या बसने निघालो. पहाटे पुण्यात आलो. मला इथे येण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा शेतात पेरणी करण्यासाठी बियाणे घ्यायला साठवलेले पैसे आईने मला प्रवासाच्या तिकिटासाठी दिले. इथे आल्यावर परीक्षा रद्द झाल्याचं कळले. आता घरी कसं तोंड दाखवायचं?’ असा सवाल हताश झालेल्या परळी वैजनाथच्या जयेश पाटीलने विचारला. स्टाफ सिलेक्शनची रविवारची परीक्षा रद्द झाल्याचे थेट परीक्षा केंद्रावर गेल्यावर कळाल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले जयेशसारखे राज्यातील असंख्य उमेदवार परीक्षा यंत्रणेवर संतप्त झालेले दिसले. या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

पिंपरी येथे रविवारी सकाळी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या विविध पदांसाठी परीक्षा होणार होती. ही परीक्षा देण्यासाठी राज्याच्या दूरच्या भागांतून (नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, परभणी, जळगाव, परळी वैजनाथ) तसेच बिहार, आसाम, बंगाल येथूनही विद्यार्थी आले होते. त्या सर्वांना थेट केंद्रावर आल्यानंतरच परीक्षा रद्द झाल्याचे कळाले. कमिशनच्या संकेतस्थळावर 24 मे रोजीच परीक्षा रद्द झाल्याचे जाहीर केले होते. मात्र, या विद्यार्थ्यांना मेलवर वा एसएमएसद्वारे निरोप कळवण्यात आला नव्हता. नॉन टेक्निकल पदांसाठी ही परीक्षा 5 दिवस घेतली जाणार होती. त्यापैकी 30 एप्रिल आणि 14 मे या दिवशी परीक्षा झाली. मात्र, पुढच्या परीक्षा रद्द केल्या. मात्र, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत कमिशनचे एसएमएस वा मेल्स पोहोचू शकलेले नसल्याने अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर दाखल झाले आणि त्यांना त्रास सोसावा लागला. आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये संगणकाधारित परीक्षा घेतली जाईल. त्याची माहिती संकेतस्थळावर दिली जाईल, असे कमिशनच्या वतीने सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांनी रात्र स्टेशनवर काढली
‘जळगावहून रात्री पुणे स्टेशनवर आलो. रात्रभर स्टेशनवरच थांबलो. इथे माझ्या परिचयाचे कोणीच नव्हते. पहाटे लवकर पिंपरीत शाळा शोधत आलो. इथे आल्यावर परीक्षा रद्द असल्याचं समजलं. आता करू तरी काय? असा प्रश्न जळगावच्या पांडुरंग साखरेने केला. अशाच पद्धतीने परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी अनुत्तरित करणारे प्रश्न विचारले आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या यंत्रणेवर टीकेचा भडिमार केला.