पृथ्वीवर सर्वात बुद्धिवान जर कोणी असेल तर तो मानव. त्यामुळे त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेतला. मात्र, परतफेड करण्याचे साफ विसरला. एखाद्या व्यक्तीकडून वा समाजाकडून जेव्हा आपण मदत घेतो तेव्हा त्याच्याप्रति नेहमी कृतज्ञ राहतो, कधीही कृतघ्न होत नाही. हा नियम पर्यावरणाशी मानवाने कधीच पाळला नाही. त्यामुळे आज पर्यावरण वाचवा यासारखी वाक्ये कानी पडत आहेत.
जगातील लोकांच्या मनात पर्यावरणाविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी, पर्यावरणाचा र्हास थांबावा या उद्देशाने 5 जून हा दिवस जगात पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाविषयी खुप काही जागृती केल्यावरसुद्धा मानवाच्या वर्तनात किंषचतसुद्धा परिवर्तन झाले नाही, बदल झाला नाही. ही फारच काळजी करण्यासारखी आणि भविष्यात चिंतेची बाब आहे. जगप्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ डॉ. रास पर्यावरणाबद्दल म्हणतात की, मानवी जीवनावर परिणाम करणारी कोणतीही बाह्यशक्ती म्हणजे पर्यावरण होय. वनस्पतीपासून प्राण्यांपर्यंत सगळ्यांच्याच जीवनावर या पर्यावरणाचा प्रभाव आढळून येतो. पर्यावरणाशी जो योग्य प्रकारे समन्वय साधतो तोच या पर्यावरणात जिवंत राहू शकतो. मानवी जीवनसुद्धा याला अपवाद नाही. पर्यावरणाने मानवाला अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत सोयीसह अन्य अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु, मानवाच्या स्वार्थी, अज्ञानी, अविचारी वृत्तीने पर्यावरणाचा बेसुमार वापर करून त्याचा र्हास केल्यामुळे अनेक जटील समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यावरणीय व्यवस्थेत असंतुलितपणा निर्माण होऊन प्राणिमात्रास धोका उत्पन्न होत आहे. मानवाच्या अविचारी वागण्यामुळे जल, हवा, ध्वनी, भूप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. औद्योगिक व रासायनिक दूषितीकरणामुळे विविध प्रकारचे आजार वाढत आहेत. ओझोन वायूचा क्षय, आम्लपर्जन्य, सागरी परिसंस्थेचा असमतोल, प्राणी व पक्षी यांचे नामशेष, नागरीकरण, वाळवंटीकरण इत्यादी समस्येसोबत वातावरणात आकस्मिक बदल हे नित्याचेच झाले. त्यामुळे रोज नवे संकट आपणासमोर तोंड वासून उभे होत आहे. या सर्व समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी प्रत्येकांनी सावधरीत्या पाऊल उचलणे गरजेचे आहे.
सर्वप्रथम मी पर्यावरणाचा एक घटक आहे. याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. ज्याप्रकारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कुटुंबाचा एक घटक असल्याचे भान ठेवून वागतो. त्यामुळेच त्या कुटुंबात सुख, समृद्धी व स्थिरता दिसून येते. कुटुंबातील एक जरी व्यक्ती बेजबाबदारपणे वागला तर संपूर्ण कुटुंबाला त्याचे फळ भोगावे लागते. पर्यावरणाचेसुद्धा थोडेफार तसेच आहे. असे वाटत नाही काय? तसेच पर्यावरणाचे माझ्यावर फार मोठे कर्ज आहे आणि ते कर्ज मला फेडायचे आहे हेही ध्यानात असू द्यावे. पर्यावरणाचा र्हास होण्यामागे वाढती लोकसंख्या हे एक प्रमुख कारण आहे. कुटुंबातील संख्या वाढीस लागली की त्यांची घरे वाढतात आणि घरे बांधण्यासाठी जमीन अधिग्रहण करणे व झाडे तोडणे क्रमप्राप्तच ठरते. त्यामुळे जंगलतोड होऊन मानवाची वस्ती वाढू लागते आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो. त्यासाठी कुटुंब नियोजनासारख्या कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार अधिक वेगात करणे आवश्यक आहे. लोकसंख्येला आळा घातल्याशिवाय आपली कोणतीही प्रगती शक्य नाही व आपला देश महासत्ता होणार नाही.
पर्यावरणातून आपणास हवा, पाणी आणि नैसर्गिक समृद्धी मिळते. ज्याद्वारे आपण चांगले जीवन व्यतित करू शकातो. अन्नाशिवाय मनुष्य एखादा दिवस जगू शकतो. परंतु, पाण्यावाचून तो जगू शकत नाही. मात्र, मानवाने पाण्याचा उपसा करत त्याचा गैरवापर केल्यामुळे आज देशात पाण्याची समस्या खूपच गंभीर बनत चालली आहे. देशातल्या एका भागात पाण्याने लोक मरतात तर दुसर्या भागात पाण्यावाचून लोक तडफडून मरतात. काही लोक पाण्याचा पैसा करतात, तर काही लोक पाण्यासाठी पैसे मोजतात. तिसेक वर्षांपूर्वी जर असे म्हटले गेले की, लोक पाणी विकून पैसा करतात. या वक्तव्यावर ते लोक हसत होते आणि पाणी कोण विकत घेणार? असा सवाल करत. परंतु, आज तेच लोक पैसे देऊन पाणी विकत घेत आहेत. खरोखरंच पाण्याच्या या व्यवहाराने पर्यावरणाचा पूर्णत: समतोलपणा बिघडवला आहे. या बाबीकडे शासनाने गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे. पाण्याची बचत व त्याचा काटकसरीने वापर करण्याची सवय प्रत्येकाने अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा यासारख्या उपक्रमाची प्रत्येकाला जाणीव करून देणे व ज्या ठिकाणी हे उपक्रम यशस्वी झाले आहेत अशा राळेगणसिद्धी किंवा हिवरे बाजार याठिकाणी प्रत्येकाने भेटी देऊन ते उपक्रम समजून घेणे आवश्यक आहे.
आपण अन्नाशिवाय एखादा दिवस, पाण्यावाचून एखादा तास जिवंत राहू शकतो मात्र हवेतील ऑक्सिजनाशिवाय क्षणभरसुद्धा जिवंत राहू शकत नाही आणि ऑक्सिजन निर्मितीचे सर्वात मोठे कार्य पर्यावरणातील वृक्ष करत असतात. वनस्पती स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात आणि हवेतील कार्बन डायऑक्साइड म्हणजे खराब हवा-वायू शोषून मानवास उपयुक्त असे ऑक्सिजन म्हणजे शुद्ध वायू हवेत सोडतात. त्यामुळे वनस्पती व वृक्षांची लागवड व संवर्धन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. जंगलतोड फार मोठ्या प्रमाणावर होताना जंगल वाचवण्यासाठी व लोकांमध्ये वृक्षाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन चालवले आणि त्यात यशस्वीसुद्धा झाले. वृक्षांचे महत्त्व अपरंपार आहे, हे आपले पूर्वजसुद्धा जाणून होते. संत तुकाराम महाराज याविषयी म्हणतात की, वृक्षवल्ली, आम्हां सोयरे, वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती… खरंच वृक्ष हे आपले सगे सोयरे, नातलग, मित्र परिवारातीलच नव्हे का? वृक्षांच्या महत्त्वाविषयी आपले पूर्वज संत, महात्मे आणि समाजसुधारकांनी ज्या बाबी सांगितल्या आहेत ते सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जंगलतोड वाढत चालल्यामुळे दिवसेंदिवस वनाचे क्षेत्र कमी कमी होत आहे. त्यामुळे जंगलात वास्तव्य करून राहणारे पशुपक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही वर्षांनी केवळ झू पार्कमध्येच एखादा प्राणी-पक्षी बघायला मिळेल की काय, अशी शंका मनात येते. पूर्वी सकाळी पक्ष्यांच्या चिवचिव-किलबिल आवाजाने जाग यायची. आजही त्याच आवाजाने जाग येते. मात्र, आजचा आवाज नैसर्गिक नसून ती मोबाइलची रिंगटोन असते. मोबाइलमुळे खूप दूरवरचे मित्र, कुटुंबातील सदस्य, नातलग आणि पाहुणे हे सर्व आपल्याजवळ असल्यासारखा भास होत आहे आणि आपल्या सहवासात असलेला निसर्ग मात्र दूर गेलेला आहे. त्यास्तव निदान वनाचे संरक्षण करण्यात आपण यशस्वी झालो तर पशुपक्ष्यांचे आपोआप संरक्षण होईल. आपल्या जीवनाप्रमाणे पशुपक्ष्यांचे जीवनसुद्धा महत्त्वाचे आहे हे विसरून चालणार नाही.आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. येथील एक तृतीयांश जनतेचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. अधिक उत्पन्न काढण्याच्या स्वार्थासाठी शेतकर्यांनी आपल्या शेतीची जुनी पद्धत बंद केली असून, रासायनिक औषध व खताचा बेसुमार वापर सुरू केला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जमिनीचा कस तर नष्ट होतच आहे. शिवाय त्या रासायनिक घटकांचा प्रतिकूल परिणाम मानवाच्या आरोग्यावर होऊन हानी पोहोचत आहे. डीडीटी या कीटकनाशक औषधाचा अतिवापर केल्यामुळे कीटकनाशक मानवाच्या शरीरात कशी पोहोचली जातात आणि ते पुढच्या पिढीत कसे संक्रमित होतात याचे सत्य कॉर्सने सन 1962 मध्ये सायलेंट स्प्रिंग या पुस्तकाद्वारे जगासमोर मांडले होते. उत्पादन कमी निघाले तरी चालेल. परंतु, रासायनिक औषध व खताचा अनावश्यक वापर टाळून सेंद्रिय खताचा वापर प्रत्येक शेतकर्याने करायला पाहिजे. सर्वच शेतकर्यांनी आपली संघटना तयार करून सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचे ठरवले, तरच सर्वांना त्याचा फायदा होतो, हे लक्षात घ्यावे.
नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये सौर ऊर्जा ही कधीही न संपणारी संपत्ती आहे. भविष्यात सौर ऊर्जेच्या वापरात वाढ करणे म्हणजे एकप्रकारे पर्यावरणाला हातभार लावण्यासारखे आहे. पेट्रोल, डिझेल यांसारख्या इंधनाचा मर्यादित साठा भविष्यकाळात संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा जपून वापर करण्यातच शहाणपणा आहे. सोबतच अमर्यादित अशा सौर ऊर्जेचा इंधनासाठी पर्याय म्हणून वापर करण्यासाठी सुरुवात केल्यास भविष्यातील अनेक संकटापासून मुक्तता मिळू शकेल. आज ज्या सौर ऊर्जेचा वापर नगण्य स्वरूपात आहे, म्हणजेच पूर्णपणे वाया जात आहे. त्याचा अनेक माध्यमातून विविध साधनांच्या मदतीने वापर करता येऊ शकतो आणि पर्यावरणाचा असमतोल थांबवता येऊ शकेल. सौर बंब, सौर चूल, आणि सौर ऊर्जेवर चालणार्या विविध उपकरणांचा जनता जास्तीत जास्त वापर कसा करू शकेल? याविषयी शासनाने महत्त्वाचे फायदेशीर निर्णय घेऊन अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे.
– नागोराव सा. येवतीकर
सामाजिक कार्यकर्ते ता. धर्माबाद
9423625769