‘पवारांना भेटा, तेच सर्व निर्णय घेतात’; राज्यपालांचा राज ठाकरेंना सल्ला

0

मुंबई: कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिघडलेली असतांनाच वाढीव वीजबिलामुळे सामान्य नागरिकांचे जीव मेटाकुटीला आले आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून रोजगार नसल्याने आर्थिक संकट आहे, त्यात वाढीव वीजबिलाने भर पडली असल्याने शासनाने तातडीने वाढीव वीज बिल कमी करावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. वाढीव वीज बिल कमी करण्याच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे.

राज्यपालांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच सरकारचे निर्णय घेतात. त्यांच्याशीच चर्चा करा असा सल्ला राज ठाकरेंना दिला आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी वीज बिलाबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचे सांगितले आहे.

दुधाला २७ ते २८ रुपये खरेदी दर देण्याची मागणीही राज ठाकरे यांनी केली आहे. सरकार समोर अनेक प्रश्न आहेत, प्रश्नांची कमतरता नाही मात्र निर्णयाची कमतरता असल्याचा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला आहे.