कोलकाता – देशावर कोरोना महामारीचे संकट घोंगावत असतानाच ‘अम्फान’ या चक्रीवादळाने पश्चिम बंगालमध्ये रौद्र रूप धारण केले आहे. या चक्रीवादळाने पश्चिम बंगाल व ओडिशामधील १२ जणांचा बळी घेतला आहे. तसेच कोट्यवधीचे नुकसान देखील झाले आहे. अम्फानचे संकट पाहता, हवामान खात्याने ओडिशा आणि आसामसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम बंगाल, तामिलनाडू, आंध्र प्रदेश, पुदुच्चेरी, त्रिपुरा, मिजोरम, मणिपुर आणि जम्मू काश्मीरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
अम्फन वादळामुळे पश्चिम बंगाल व ओडिशाच्या किनारी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला असून मोठे नुकसान झाले आहे. अनेक झाडे, घरे उन्मळून पडली असून विद्युत खांबही कोसळले आहेत. सुमारे ६ लाख ५८ हजार लोकांना दोन राज्यात सुरक्षित ठिकाणी हलवले असून यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची ४१ पथके दोन राज्यात तैनात केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रमुख एस.एन प्रधान यांनी सांगितले की, ओडिशात २० पथके रस्ते मोकळे करण्याचे काम करीत असून पश्चिम बंगालमध्ये १९ पथके लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत. दिघा येथे वादळाने भरतीच्या मोठ्या लाटा आल्या. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होऊन कच्ची घरे कोसळली, झाडेही पडली आहेत.