भुसावळ । काेराेना संसर्गाचे कारण पुढे करत रोज प्रवास करणाऱ्यांना मासिक पास देण्यास मध्य रेल्वेतील भुसावळ विभाग नकार देत आहे. मात्र पश्चिम रेल्वे विभागातून मासिक पास वितरण सुरू आहे. धरणगाव ते जळगाव असा पास मिळत असल्याने एकाच जिल्ह्यातील नागरिकांना रेल्वेच्या दोन वेगवेगळ्या नियमांचा अनुभव येत आहे.
विशेष दर्जा रद्द झाल्यावर सर्व जलद गाड्या नियमित पद्धतीने धावत आहेत. दुसरीकडे पॅसेंजर गाड्या बंद करून त्याऐवजी मेमू गाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र, मध्य रेल्वेने या गाड्यांमधून अजूनही मासिक पास धारकांना प्रवासाची परवानगी दिलेली नाही. काेराेनाचे नियम सांगत आणि वरिष्ठ पातळीवरून सूचना येत नाही ताेपर्यत पास देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.