पिंपरी-चिंचवड : उन्हाळ्याच्या दिवसांतच शहरातील महापालिकेचे अनेक जलतरण तलाव पाणी अशुद्धतेच्या कारणामुळे बंद राहण्याचे प्रमाण वाढले आहे. यास पूर्णपणे ठेकेदारांची कार्य प्रवृत्ती जबाबदार असूनही क्रीडा प्रशासनाकडून त्याची योग्य ती दखल घेतली जात नसल्याने तरण शौकिनांच्या तसेच अबाल-वृद्धांच्या आनंदावर विरजण पडत आहे. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत असून, कामात हलगर्जीपणा करणार्या ठेकेदार संस्थांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
शहरात 10 जलतरण तलाव
महापालिकेच्या क्रीडा विभागांतर्गत शहरात नेहरूनगर, थेरगाव, सांगवी, मोहननगर, प्राधिकरण, कासारवाडी, यमुनानगर, भोसरी, चिंचवडगाव व पिंपळेगुरव आदी ठिकाणी दहा जलतरण तलाव आहेत. पिंपरी व शाहूनगर येथे नव्याने तलाव बांधण्यात आले असून, तेही लवकरच चालू होतील. या सर्वच तरण तलावावरील पाणी स्वच्छता करण्याबरोबरच स्नानगृहे, शौचालयांच्या साफसफाईचे कामकाज ठेकेदार पद्धतीने वरदायनी व सुमित अशा संस्थांना अनेक वर्षांपासून दिले आहे. यामध्ये यमुनानगर, प्राधिकरण, नेहरूनगर, कासारवाडी, सांगवी, चिंचवड या जलतरण तलावांचे काम वरदायनी संस्थेकडे आहे, तर उर्वरित तलाव सुमित कंपनीकडे आहेत.
क्रीडा विभागाचे दुर्लक्ष
तलावातील पाण्याची व स्वच्छतेची जबाबदारी पूर्णपणे या ठेकेदार संस्थेकडे असून, यासाठी लागणारे साहित्य तसेच इतर यंत्रणा उभी करणे त्यांना बंधनकारक आहे. परंतु या कामासाठी आवश्यक असलेले साहित्य ठेकेदार संस्थेकडे नसते; हे वारंवार निदर्शनास आले आहे. यामुळे नेहमीच नेहरूनगर बरोबरच मोहननगर, सांगवी, कासारवाडी व प्राधिकरण येथील तलाव पाणी अस्वच्छतेमुळे बंद असतात. यामुळे कराराचा भंग होत आहे, तरीदेखील क्रीडा विभागाकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात पाणी संकटामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरातील सर्वच जलतरण तलाव बंद होते. सध्याही पवना धरणाच्या खालावत जाणार्या पाण्याच्या पातळीमुळे पुन्हा शहरातील तरण तलाव बंद ठेवण्याची वेळ येणार असल्याचे बोलले जात आहे. तोपर्यंत नागरिक जलतरण तलावात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी तलावावर गर्दी करत आहेत; परंतु पाणी अशुद्धतेमुळे त्यांना पोहण्याच्या आनंदापासून वंचित रहावे लागत आहे.
एका तलावावरीलच साहित्याचा सर्वत्र वापर
जलतरण तलाव स्वच्छतेसाठी लागणार्या साहित्य-साधनांचा अभाव असल्यामुळे पाणी लवकर स्वच्छ करण्यास अडथळा निर्माण होत आहे. तसेच एकाच तरण तलावावरील साहित्य इतरही तलावासाठी वापरले जात आहे. त्यामुळे पाणी स्वच्छ करण्यासाठी विलंब होत आहे. संस्थेकडे मनुष्यबळाची कमतरता असून तलावातील पाणी स्वच्छतेसाठी आवश्यक मोटार पंप, सेक्शन मारण्यासाठी लागणारे साहित्य तसेच इतरही यंत्रणांची वानवा आहे. सर्व तलावावर ठेकेदाराकडून स्वतंत्र साहित्य उपलब्ध करणे करारानुसार बंधनकारक आहे; परंतु संस्थेकडून कराराचा वारंवार भंग होताना दिसत असूनही क्रीडा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.