पालघर : ही राजकारणाची वेळ नाही – अनिल देशमुख

0

मुंबई: पालघरमध्ये दोन साधूंची झालेली हत्या अत्यंत दुर्देवी आहे. ही घटना घडल्यानंतर अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी १०१ जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत न्याय व्हावा म्हणून आम्ही हे प्रकरण तात्काळ सीआयडीकडे दिले. पण या घटनेचा फायदा उचलून काही लोक पालघरच्या घटनेचे जातीचे राजकारण करून मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत आहेत, असा खोचक टोला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांना लगावला आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. करोनाच्या संकटात एकत्र येऊन लढण्याची ही वेळ आहे, असेही देशमुख म्हणाले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ट्विटर लाइव्हवरून जनतेशी संवाद साधत पालघर आणि वाधवान प्रकरणावर भाष्य केले. वाधवान कुटुंबीयांचा क्वॉरंटाइन पिरियड आज दुपारी २ वाजता संपणार आहे. ईडी आणि सीबीआयला आम्ही कालच पत्र लिहून त्याबाबतची कल्पना दिली आहे. तसेच वाधवान यांना ताब्यात घेण्याची विनंतीही सीबीआयला केली आहे. वाधवान यांना ताब्यात घ्या आणि त्यांची चौकशी करा, असे सांगतानाच मधल्या काळात काही लोक लंडनला पळाले आहेत, याकडेही त्यांनी सीबीआयचे लक्ष वेधले.