पावसाळ्यासाठी सज्ज व्हा

0

मुंबई – पावसाळ्यात साथीच्या आजारांनी आदिवासी आणि दुर्गम भागात डोके वर काढू नये यासाठी संबंधित यंत्रणांनी आतापासूनच आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना राबवाव्यात. आरोग्य, महिला व बालविकास, आदिवासी विभागांनी समन्वयातून या योजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी बुधवारी दिले.

आदिवासी भागात होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा मुख्य सचिव मल्लिक यांनी आज मंत्रालयात घेतला. मुख्य सचिवांच्या दालनात गाभा समितीची बैठक झाली. आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. विजय सतबिरसिंग, वित्त विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा, आदिवासी विभागाच्या सचिव मनिषा वर्मा, महिला व बालकल्याण सचिव विनीता सिंघल, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्यासह पालघर, नंदुरबार, अमरावती येथील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आदिवासी भागात काम करणारे स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

आदिवासी भागातील बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना आहेत. विविध विभागांनी आणि जिल्हा प्रशासनाने समन्वय ठेवून योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्यास त्याचे परिणाम नजरेस पडतील. कुपोषित बालकांना ग्रामविकास समितीच्या माध्यमातून उपचार व पोषण आहार देण्याबाबत नियोजन करावे. पावसाळ्यात आदिवासी आणि दुर्गम भागात याविषयी विशेष दक्षता घेण्याविषयी मुख्य सचिवांनी निर्देश दिले. अंगणवाडीस्तरावर डायरिया, ताप, खोकला यावरील प्राथमिक उपचाराची औषधे ठेवावीत आणि ‘आशा’ कार्यकर्तीच्या माध्यमातून आजारी बालकांना प्रथमोपचार म्हणून ही औषधे देण्याची व्यवस्था करण्यात यावी. अशा प्रकारचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प राबवावा, अशी सूचना यावेळी मुख्य सचिवांनी केली. अंगणवाडी सेविकांचे मानधन वेळेवर अदा करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.