पिंपरी चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा कायम

0

पिंपरी :- नोव्हेंबर महिन्यात दोन महिन्यांसाठी नागरिकांवर लादण्यात आलेली पाणी कपात मुदत संपल्यानंतरही कायमच राहणार आहे. समन्यायी पाणी पुरवठ्याचे कारण देत सुरु करण्यात आलेली पाणीकपात जोपर्यंत जादा 30 एमएलडी पाणी मिळत नाही तोपर्यंत कायमच राहणार आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरूच ठेवणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

जुलै अखेर पुरेल एवढा पाणीसाठा पवना धरणात उपलब्ध असतानाही शहरवासियांना दररोज पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाने दोन महिन्यांसाठी म्हणजेच 25 जानेवारीपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा केला होता. मात्र, आयुक्त हर्डीकर यांनी मांडलेल्या भूमिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा यापुढे देखील राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पवना धरणात शंभर टक्के पाणीसाठा असताना समन्यायी पाणी वाटपाच्या मुद्द्यावर शहरवासियांना हिवाळ्यातच एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागले होते. नागरिकांकडून सुरू झालेल्या विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या तक्रारी लक्षात घेता आयुक्त हर्डीकर यांनी 25 नोव्हेंबर 2019 पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. त्याचवेळी एकदिवसाआड पाणीपुरवठा केवळ दोन महिन्यासाठी म्हणजेच 25 जानेवारी 2020 पर्यंत केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. शहरातील अनधिकृत नळजोडांबाबत कारवाई करून तसेच मोटारी जप्त करून पाणी पुरवठ्याबाबत सुसूत्रता आणली जाणार होती. दिवसाआड पाणीपुरवठ्याला सत्ताधारी भाजपने समर्थन दिले होते. एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची मुदत शनिवारी (दि.25) संपली. त्यामुळे एक दिवसाआड पाणी कपात मागे घेऊन दररोज पाणीपुरवठा होईल, अशी शहरवासियांना अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे.

सत्ताधारी व विरोधक गप्प
शहरात दोन महिन्यांसाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झालेला होता. हा निर्णयानुसार गेली दोन महिने एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या पवना धरण क्षेत्रात 78 टक्के पाणीसाठा असताना देखील नागरिकांना समन्यायी पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवला आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजप तसेच विरोधकांतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे याबाबत अद्याप गप्पच आहेत. महापालिका प्रशासनाच्या एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू ठेवण्याच्या निर्णयाबाबत ते काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, शहरवासियांना दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी आणखी 30 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. जादा लागणारे 30 एमएलडीपाणी अद्याप उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवण्यात आला आहे. जोपर्यंत 30 एमएलडी जादा पाणी मिळत नाही. तोपर्यंत एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार आहे. महापालिकेची पाणीपुरवठा शुद्धीकरण क्षमता वाढवावी लागणार आहे.त्यानंतरच आपण अतिरिक्त पाणी उचलू शकतो.
– श्रावण हर्डीकर, मनपा आयुक्त