पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील 19 नदीप्रेमी संस्था एकत्र

0

भारतीय नदी दिवसानिमित्त शहरात होणार मुठाई महोत्सव

घाटावर स्वच्छता अभियान राबवून अभियानाची सुरुवात

पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून आणि परिसरातून वाहणार्‍या नद्या मरणासन्न झाल्या आहेत. त्यांना पुन्हा उर्जितावस्था मिळावी. पुन्हा नद्यांचे वैभव खुलावे यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील 19 नदीप्रेमी संस्था एकत्र आल्या आहेत. या संस्था नद्यांच्या विविध प्रश्‍नांवर तोडगा काढून त्यांना पुन्हा समृद्ध करण्यासाठी भारतीय नदी दिवसानिमित्त मुठाई महोत्सव साजरा करणार आहेत. 25 नोव्हेंबरपासून मुठाई महोत्सवाला सुरु होणार आहे. या दिवशी मुठा नदीवरील विठ्ठलवाडी घाट, एस.एम.जोशी पुलाजवळील घाट, मुळा नदीवरील गणेश घाट, औंध आणि नवीन बाणेर, लिंक रोडवरील घाटावर स्वच्छता अभियान राबवून अ भियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. सोमवार (दि. 26) रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत नदी विषयावर चित्रकला, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

सायक्लोथॉन पार पडणार

दि.25 नोव्हेंबरपासून मुठाई महोत्सवाला सुरु होणार आहे. मंगळवारी आणि बुधवारी शहरातील मुठा नदीजवळ सिद्धेश्‍वर घाटाजवळ प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. तसेच पवना नदीवर महाआरती करण्यात येणार आहे. रविवार (दि. 2 डिसेंबर) रोजी विविध सामाजिक संस्थांच्यावतीने सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे तीन हजार सायकलस्वार सहभाग घेणार आहेत. मंगळवार (दि.11 डिसेंबर) रोजी औंध येथील पु.ना.गाडगीळ आर्ट गॅलरी येथे नदी विषयांवरील चित्रप्रदर्शन आयोजित क रण्यात आले आहे. यामध्ये विविध महाविद्यालये, शाळां, सोसायटी, गृहप्रकल्पांमधील नागरिक, विद्याथी, महिला सहभागी होणार आहेत. त्यामध्ये सर्वांनी सहभागी झाले पाहिजे.

नदीविषयी जनजागृती करणार

पुण्यामध्ये जीवितनदी या संस्थेने 2015 पासून भारतीय नदी दिवस ‘मुठाई महोत्सव’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. या निमित्ताने नदी परिसरात विविध कार्यक्रम घेऊन नागरिकांना नदी आणि नदीच्या प्रश्‍नाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. यातूनच शहर परिसरातील अनेक संस्था एकत्रित आल्या. त्यातून नदीला प्रदूषणमुक्त करण्यात येत आहे. या संस्थांनी 2020 सालापर्यंत घनकचरामुक्त नद्या आणि 2025 सालापर्यंत विषद्रव्यमुक्त नद्या करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षीच्या भारतीय नदी दिवसादिवशी महापालिका प्रशासनाला नदीच्या विविध समस्यांविषयी पत्र देण्यात येणार आहे. संस्थांच्यावतीने महापालिका प्रशासन आणि शहरातील नागरिकांना सहभागी करून घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.