पुणे । राज्य शासनाने पुरवणी पाणीटंचाई आराखड्याची कामे 30 जूननंतर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अजूनही पाणी टंचाईची समस्या गंभीर आहे. यामुळे पुरवणी पाणीटंचाई आराखड्यातील कामांना मुदत वाढ देण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे.
995 कामे कागदावरच
जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मूळ टंचाई आराखडा आणि पुरवणी टंचाई आराखडा तयार केला होता. या आराखड्यातील काम करण्याची अंतिम मुदत 30 जून होती. मूळ टंचाई आराखड्यातील 1 हजार 95 कामे प्रशासनाने मुदतीमध्ये पूर्ण केली. मात्र, जिल्हा परिषद सदस्यांनी मागणीनुसार, केलेल्या पुरवणी टंचाई आराखड्यातील कामे 30 जूनपूर्वी सुरू झाली नाही. कामाची मुदत संपल्यामुळे पुरवणी टंचाई आराखड्यातील जवळपास 995 कामे कागदावरच राहिली आहे.
बैठकीत दाद मागणार
पुरवणी टंचाई आराखड्यातील कामे पुन्हा सुरू करावी. ही कामे करण्यासाठी शासनाकडून मुदतवाढ घ्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी मुख्य सभेमध्ये केली होती. यावेळी विश्वास देवकाते यांनी टंचाई आराखड्याबाबत जिल्हा नियोजन समिती बैठकीत दाद मागण्याचे जाहीर केले होते.
200 गावांमध्ये कामे
पुरवणी पाणीटंचाई आराखड्यानुसार, जिल्ह्यात 200 गावांमध्ये कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये 723 विंधनविहीरी कुपनिलका घेणे, 48 नळ योजनांची विशेष दुरुस्ती, 85 विंधन विहीरींच्या दुरुस्ती, नळ पाणी पुरवठा योजना वेगाने पुर्ण करणे, 13 तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना, 49 विहिरींचे अधिग्रहण, 37 विहीरींचा गाळ काढून, विहीरी खोल करणे, टँकरने पाणी पुरवठा करणे आदी कामे करण्यात येणार होती.
24 गावांना टँकरने पाणी पुरवठा
जिल्ह्यामध्ये अपुरा व अनिमित पाऊस होत आहे. आजही जिल्ह्यातील 24 गावांतील 328 वाड्यावस्त्यातील 92 हजार 878 नागरिकांना 39 टँकरने पाणीपुरवठा होत आहे. जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी पाणीटंचाई पुरवणी आराखड्यातील कामे होणे गरजेचे आहेत. या आराखड्यातील अनेक कामांची निविदा प्रकिया झाली आहे. ही कामे करण्याची 45 दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पालकमंत्र्याकडे केली आहे.