पेपरलेस स्वच्छ सर्वेक्षणाला सुरुवात  

0
मोहिमेत सहभागी होण्याचे महापौरांचे आवाहन
पिंपरी चिंचवड : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान स्वच्छ सर्वेक्षण 2019 करिता पिंपरी-चिंचवड महापालिका सज्ज झाली आहे. केंद्र शासनामार्फत शुक्रवारपासून सर्वेक्षणास सुरुवात केली आहे. 4 ते 31 जानेवारी दरम्यान केंद्राचे पथक अचानक शहरात येऊन पाहणी करणार आहेत. यंदाचे सर्वेक्षण हे पेपरलेस होणार असून या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर राहूल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शहरांचे सर्वेक्षण केले जाते. आजपासून स्वच्छ सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पहिल्या स्वच्छ सर्वेक्षणात देशात नववा क्रमांक, त्यानंतर दुसर्‍या सर्वेक्षणात 17 वा क्रमांक आणि गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणात 46 वा क्रमांक मिळाला होता. यंदाच्या सर्वेक्षणात चांगले गुण मिळावेत, यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. स्वच्छ अभियानाची  पूर्वतयारी केली आहे.  गृहनिर्माण सोसायटी, हॉटेल, रुग्णालय, शाळा महाविद्यालयातील विदयार्थी, सेवाभावी संस्था, बचतगट, स्वयंसेवी संस्था, नागरिक, मनपाचे सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना स्वच्छता मोहिमेत सहभागी करुन घेतले आहे. चिंचवड शहरास या सर्वेक्षणात चांगला गुणानुक्रमांक मिळावा, असा निर्धार महापालिकेने केला आहे.
मुल्यांकनासाठी 5 हजार गुणांची प्रश्‍नावली…
शहरांचा गुणानुक्रम निश्‍चित करण्यासाठी संकलीत केलेली माहितीचे स्वच्छ सर्वेक्षण 2019 मुल्यांकनासाठी पाच हजार गुणांची प्रश्‍नांवली आहे. त्याचे विभाजन चार भागात केलेले आहे. यास प्रत्येकी 1250 याप्रमाणे गुणांक आहेत. महानगरपालिकेकडुन प्राप्त झालेली ऑनलाईन माहिती, कचरा मुक्त शहरांसाठी प्रमाणपत्रे (स्टार रेटींग) आणि ओपन डेफिकेशन फ्री सिटीज ( ओडीएफ),  प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे प्राप्त झालेली माहिती असा आहे. नागरिकांच्या प्रतिसादाद्वारे अभिप्रायान्वये प्राप्त झालेली माहितीलाही गुण मिळणार आहे. याबाबतची सर्व तयारी महापालिकेने केली आहे, असे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले.
स्वच्छ सर्वेक्षणातील ठळक मुद्दे!
– स्वच्छ सर्वेक्षण होणार पेपरलेस
– शंभर टक्के कचरा निर्मितीच्या ठिकाणी वर्गीकरणावर भर
– स्टार रेटिंग प्रोटोकॉलची अंमलबजावणी सुनिश्‍चित करणे
– सार्वजनिक आणि सामुदायिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती व स्वच्छता
– स्वच्छ भारत अ‍ॅप्सलाही गुण
– नागरिकांच्या सहभागाकरीता स्वच्छ भारत मंचाची निर्मिती
– नागरिक त्यांच्या वैयक्तिक नवकल्पना समाविष्ठ करू शकतात
– घरगुती खत निर्मितीवर भर
– उप-विधीमध्ये स्वच्छता सेवा स्तराचा समावेश